अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांची ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध क्षेत्रात केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल त्यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्काराने गौरविण्यात आले.
शहरातील माऊली संकुल सभागृहात माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते डोंगरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य संघटक अमोल शेवाळे, यादवराव पावसे, रोहित पवार, उद्योजिका वंदनाताई पोटे, रविंद्र पवार, राजेंद्र गिरी, रविंद्र पावसे, ॲड. प्रविण कडाळे, श्रीराम शिंदे, दुर्गा भालके, निलेशकुमार पावसे, संजय काळे आदी उपस्थित होते.
निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम घेऊन निस्वार्थ भावनेन तेे योगदान देत आहे. गावात वाचनालय चालवून युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन देण्याचे त्यांचे कार्य सुरु असून, पर्यावरण संवर्धन व गावात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ त्यांनी चालवली आहे.
कोरोना काळात बंद झालेली बस सेवा त्यांनी पाठपुरावा करुन ग्रामस्थांसाठी सुरु करुन दिली. तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडविण्याचे व नागरी सुविधा निर्माण करुन देण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. गावातील अनेक महत्त्वांच्या रस्ते होण्यासाठी त्यांनी प्रयत्न करुन सदर कामे मार्गी लावली. विकासात्मक कार्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. ग्रामपंचायतमध्ये केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.