जनविरोधी भाजप सरकार हटाव देश बचावचा घोषणा देत शहरातून निघाली रॅली
डावे व पुरोगामी पक्ष, संघटनांसह विविध क्षेत्रातील कामगारांचा सहभाग
अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र (आयटक) च्या वतीने शाहू महाराजांचे जन्मगाव कोल्हापूर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दीक्षाभूमी नागपूर दरम्यान निघालेली राज्यव्यापी महासंघर्ष यात्रेचे शहरात गुरुवारी (दि.30 नोव्हेंबरला) डावे, पुरोगामी पक्ष व भाजप विरोधातील समविचारी पक्ष आणि संघटनांच्या वतीने स्वागत करुन रॅली काढण्यात आली. जनविरोधी भाजप सरकार हटाव देश बचाव…, भाजप हटाव संविधान बचाव….च्या घोषणा देत व हातात लाल झेंडे घेऊन निघालेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले.

लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथून रॅलीचे प्रारंभ झाले. यामध्ये आयटकचे राज्य सरचिटणीस कॉ. शाम काळे, राष्ट्रीय कामगार नेते कॉ. कारभारी उगले, आशा गटप्रवर्तक संघटनेचे अध्यक्ष कॉ. राजू देसले, राष्ट्रीय सदस्य तथा निमंत्रक कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, कॉ. सुरेश पानसरे, कॉ. सुभाष लांडे, कॉ. ॲड. बन्सी सातपुते, कॉ. भैरवनाथ वाकळे, सुवर्णा थोरात, भारती न्यालपेल्ली, कॉ. निवृत्ती दातीर, कॉ. संजय नांगरे, सतीश पवार, संजय डमाळ, मारुती सावंत, जयश्री गुरव, वर्षा चव्हाण, कविता गिरे, फिरोज शेख, दत्ता वडवणीकर, अरुण थिटे, संतोष गायकवाड, सतीश निमसे आदींसह विविध क्षेत्रातील कामगार वर्ग व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान आयटकच्या वतीने राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा सुरू आहे. ही यात्रा गुरुवारी शहरात दाखल झाली. रॅलीने जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, मार्केटयार्ड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, माळीवाडा येथील महात्मा फुले यांचा पुतळा, वाडियापार्क येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शहरातून मार्गक्रमण केले. रॅलीत सहभागी कामगार वर्गाने भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या रॅलीचा समारोप स्वस्तिक चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झाला. रॅलीत जिल्हा आशा व गटप्रवर्तक संघटना, लालबावटा विडी कामगार संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य पतसंस्था व जिल्हा कर्मचारी संघटना, लालबावटा जनरल कामगार, तलरेजा फर्म कर्मचारी, अवतार मेहेरबाबा कामगार युनियन, मोहटादेवी कामगार संघटना, लालगीर बुवा ट्रस्टचे कामगार वर्ग, आयटक आणि डावे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.