• Sun. Jul 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

किशोर संस्कृत संवर्धिनी शाळेत चिमुकल्यांची भक्तीमय दिंडी; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला

ByMirror

Jul 25, 2026
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलभक्तीचा अनोखा संस्कार सोहळा; बाल वारकऱ्यांनी सादर केला रिंगण आणि फुगड्यांचा फेर

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलभक्तीचा अनोखा संस्कार सोहळा; बाल वारकऱ्यांनी सादर केला रिंगण आणि फुगड्यांचा फेर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या किशोर संस्कृत संवर्धिनी शाळेत भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बाल वारकरी दिंडीमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून सोडला. टाळ-मृदुंगाचा निनाद, भगव्या पताकांची दिमाखदार उंचावलेली पताका आणि “जय हरी विठ्ठल”, “ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या अखंड नामघोषामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले.


दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्‍वर महाराज, संत तुकाराम महाराज तसेच विविध संत-महात्मे आणि वारकरी यांची आकर्षक व पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. या वेषभूषेमुळे वारकरी संप्रदायाची परंपरा आणि संत साहित्याची समृद्ध परंपरा जिवंत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हातात टाळ, डोक्यावर तुळशीची माळ, भगवे ध्वज आणि मुखी विठ्ठलनाम असा वारकरी वेश परिधान करून चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी अभंग, भजन आणि नामस्मरण करत भक्तीचा उत्साह अनुभवला. “जय जय राम कृष्ण हरी”, “ज्ञानोबा-तुकाराम” तसेच “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या नामघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. टाळ-मृदुंगाच्या तालावर विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण उपस्थितांच्या मनाचा ठाव घेणारे ठरले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेत भक्तीमय सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठलभक्तीवरील गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय शाळेच्या मैदानावर पारंपरिक वारकरी पद्धतीने रिंगण सोहळा सादर करण्यात आला. चिमुकल्यांनी उत्स्फूर्तपणे सादर केलेल्या या रिंगण सोहळ्याला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.


मुलींनी पारंपरिक वेशभूषेत फुगड्यांचा फेर धरत महाराष्ट्राच्या लोकसांस्कृतिक परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. टाळ-मृदुंगाच्या लयबद्ध तालावर आणि विठ्ठलनामाच्या गजरात विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. या उपक्रमामागील मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, संत साहित्याविषयी आदर, भक्तीभाव, संस्कार, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमान निर्माण करणे हा होता.


संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी तसेच संस्थेच्या सर्व विश्‍वस्तांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता गोत्राळ यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे नियोजन करण्यात आले. तसेच सौ. कविता रच्चा, वैशाली दरबेसवार, सौ. आश्‍विनी कोल्हे यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिंडी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *