• Tue. Jun 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

एकल माता भगिनींच्या हस्ते वट पौर्णिमेला वटवृक्षारोपण

ByMirror

Jun 30, 2026
कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम

पुरोगामी विचार, स्त्री सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश


कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनचा उपक्रम


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने भारतीय संस्कृतीत विशेष परंपरा असलेल्या वट पौर्णिमेच्या दिवशी एकल माता भगिनींच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. समाजातील वंचित, उपेक्षित आणि संघर्षमय जीवन जगणाऱ्या एकल माता भगिनींना सन्मानाचे स्थान देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
शहरातील वृंदावन कॉलनी, वर्धमान महावीर कॅम्पसजवळ, नगर-कल्याण रोड येथे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील शेळके यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. भारतीय संस्कृतीत वटवृक्षाला दीर्घायुष्य, स्थैर्य, संरक्षण आणि जीवनदायी शक्तीचे प्रतीक मानले जाते. त्याच वटवृक्षाच्या साक्षीने समाजातील एकल माता भगिनींना सन्मानपूर्वक व्यासपीठ देऊन त्यांच्याप्रती आदर, संवेदना आणि सामाजिक बांधिलकी व्यक्त करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. या प्रसंगी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती सुवर्णाताई जाधव, नगरसेविका वैशालीताई नळकांडे, आपला मावळा महिला प्रदेशाध्यक्षा प्रियंका पाटील शेळके – बोबडे, सामाजिक सेविका अश्‍विनी झरेकर, गायत्री बागडे, शारदा विधावे, रेणुका नाळके, आशा शेळके, माधुरी शेळके, मंदाकिनी पवार, साक्षी बागडे, तसेच नरेंद्र पवार, प्रणव पवार, युगांक दुशिंग व भारत धारवाले आदींसह एकल महिला उपस्थित होत्या.


या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष असून, मागील वर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमाला समाजातील विविध स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वटपौर्णिमा हा सण केवळ धार्मिक आणि पारंपरिक स्वरूपात साजरा न करता, त्यामध्ये सामाजिक समता, स्त्री सक्षमीकरण आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समावेश करून पुरोगामी विचारांचा संदेश देण्याचा प्रयत्न कृष्णाली व कृष्णप्रित वेल्फेअर फाउंडेशनच्या माध्यमातून सातत्याने केला जात आहे.


समाजात अनेकदा एकल माता भगिनींना संघर्ष, उपेक्षा आणि सामाजिक दबावाला सामोरे जावे लागते. मात्र, त्यांना केवळ सहानुभूतीची नव्हे तर सन्मानाची गरज आहे, या विचारातून या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली. एकल महिलांच्या संघर्षाला सलाम करत, त्यांच्या आत्मविश्‍वासाला बळ देण्याचा आणि समाजात त्यांचे योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.


प्रशांत पाटील शेळके म्हणाले की, “वटपौर्णिमा हा सण केवळ परंपरा म्हणून साजरा करण्यापेक्षा त्याला सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीची जोड देणे आवश्‍यक आहे. समाजातील एकल माता भगिनींना सन्मान देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राज्यभर राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी उपस्थित प्रत्येक एकल माता भगिनींच्या हस्ते वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेतली. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्‍वभूमीवर वृक्ष संवर्धनाची गरज अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
समाजातील एकल माता भगिनींना सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्‍यकता असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. स्त्री सन्मान, सामाजिक समता आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा संगम घडविणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *