विद्यार्थ्यांचे शिक्षण हे उज्वल भविष्यासाठीची गुंतवणुक -पूनम थोरात
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सडे (ता. राहुरी ) येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, राहुरी येथील अभियंता पूनम थोरात होत्या. यावेळी आरोग्य विभागाच्या कु. हर्षदा पेरणे, शाळेचे मुख्याध्यापक विनायक पानसंबळ, बाळासाहेब कल्हापुरे आदींसह शिक्षकवृंद, कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियंता पूनम थोरात यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत मन लावून अभ्यास करण्याचा संदेश दिला. शिक्षणातून सशक्त समाज आणि संस्कारी पिढी घडणार आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण हे उज्वल भविष्यासाठीची गुंतवणुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी शिक्षण, शिस्त, स्वावलंबन आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक विनायक हरिदास पानसंबळ तसेच शिक्षकवृंदांनी उत्कृष्टरीत्या केले होते. विद्यार्थ्यांचे स्वागत, साहित्य वाटप आणि कार्यक्रमाने शालेय परिसर गजबजला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश उपलब्ध करून देणाऱ्या शासनाच्या या विद्यार्थीहिताच्या उपक्रमाचे पालकांनी स्वागत केले.

