सामाजिक बांधिलकी जोपासणारा सुयोग पार्क परिसरातील नागरिकांचा उपक्रम
पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांनी कृतीशील होणे गरजेचे -दत्ता गाडळकर
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील गोरक्षनाथगड व मांजरसुंबा डोंगर परिसरात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अर्जुन सौताडा या आयुर्वेदिक वृक्षांच्या बियांची लागवड करण्यात आली. कल्याण रोड येथील सुयोग पार्क परिसरातील नागरिकांनी एकत्र येत हा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम राबविला. पर्वत, गड व डोंगर भागातील हरवलेली हरितता पुन्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडळकर, संतोष दसासे, परमेश्वर पाटील, शंकर राखुंडे, ॲड. संतोष शिनारे, रमेश गवळी, विजय कांडेकर, वसंत खोसे, नामदेव गुंड, उमेश दळवी, राजू कानडे, ॲड. नवनाथ नरसाळे, सागर गांधी, संतोष निमसे, ताराचंद भणगे, दिलीप गायकवाड, सखाराम मोटे मेजर यांसह अनेक युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दत्ता गाडळकर म्हणाले की, आपल्या आजूबाजूचा निसर्ग हा मानवाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पुढाकार घेऊन पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील होणे गरजेचे आहे. अर्जुन सौताडा हे झाड फक्त पर्यावरणपूरक नाही तर आयुर्वेदिकदृष्ट्याही अत्यंत उपयोगी आहे.
या झाडांची लागवड केल्याने केवळ हरित पट्टा वाढणार नाही, तर औषधीदृष्ट्याही लाभ मिळणार आहे. डोंगरदऱ्या हिरवळीत न्हाल्यास भविष्यात पाणी, हवा व आरोग्य यांच्यावर सकारात्मक परिणाम होईल. या चळवळीत सर्वांच्या सहभागाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.