• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

सामाजिक संस्था व युवा मंडळाच्या पुढाकाराने स्वच्छता ही सेवा अभियानास प्रारंभ

ByMirror

Sep 22, 2024
सामाजिक संस्था व युवा मंडळाच्या पुढाकाराने स्वच्छता ही सेवा अभियानास प्रारंभ

खरात यांना नेहरु युवा केंद्राच्या राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल सत्कार

स्वच्छता ही सामाजिक कर्तव्य म्हणून पाळली गेल्यास सदृढ व निरोगी समाज होणार -शिवाजी खरात

अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वांच्या निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता आवश्‍यक आहे. प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी काळजी घेताना स्वच्छता पाळणे काळाची गरज आहे. वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता व सार्वजनिक परिसराची स्वच्छता ही सामाजिक कर्तव्य म्हणून पाळली गेल्यास सदृढ व निरोगी समाज होणार असल्याची भावना नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक शिवाजी खरात यांनी व्यक्त केली.


माय भारत अंतर्गत नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, जय युवा अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा प्रारंभ नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक खरात यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, क्रीडा अधिकारी सुनील धारुडकर, सामाजिक कार्यकर्ते सुहास सोनवणे, जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, ॲड. श्रीकृष्ण मुरकुटे, उडाणच्या आरती शिंदे, बायडाबाई शिंदे, पै. नाना डोंगरे, निलेश थोरात, आधारवडच्या ॲड. अनिता दिघे, सूर्या मॉर्निंग ग्रुपचे राजकुमार चिंतामणी, श्रीनिवास नागुल, संतोष लयचेट्टी, मनीषा शिंदे, रमेश गाडगे, चंद्रकांत पाटोळे, राष्ट्रीय सेवाकर्मी दिनेश शिंदे, माहेरच्या रजनी ताठे, भीमा गौतमीच्या अधीक्षिक रजनी जाधव, तुषार शेंडगे आदी उपस्थित होते.


पुढे खरात म्हणाले की, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आदी साथीचे आजार अस्वच्छतेमुळे पसरत आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छता जबाबदारी समजून केली पाहिजे. भविष्यात स्वच्छतेवर निरोगी आरोग्य टिकून राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानेश्‍वर खुरांगे यांनी उपस्थित युवा मंडळाच्या प्रतिनिधींना सार्वजनिक स्वच्छतेची शपथ दिली. नेहरु युवा केंद्रचे राज्य उपसंचालक शिवाजीराव खरात यांना राज्य संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल जिल्ह्यातील सामाजिक संस्था व युवा मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


दुपारच्या सत्रात सामाजिक कार्यकर्ते सुहास सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगर-संभाजीनगर महामार्गावरील भीमा गौतमी वस्तीगृह परिसरात स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत प्रत्यक्ष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सोनवणे म्हणाले की, शंभर तास स्वच्छतेचे माय भारत अंतर्गत युवा युवर्गाने स्वतःहून पुढाकार घेऊन सामाजिक आरोग्य जपले तर पुढील पिढी सदृढ निरोगी आरोग्य जगू शकेल. मी घाण करणार नाही, इतरांनाही घाण करू देणार नाही! हा संकल्प करुन या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. जय असोसिएशन ऑफ एनजीओच्या (महाराष्ट्र राज्य) माध्यमातून युवक मंडळ, सामाजिक संस्था, बचत गट स्वच्छता मोहिमेत जिल्हाभरात सक्रिय सहभागी होतील, असे महेश शिंदे यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *