सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची मागणी
भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण कराव्या
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या नगर तालुक्यातील जय मल्हार गड कोथुळ (खंडोबा) देवस्थानला तीर्थक्षेत्र घोषित करुन भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयात देण्यात आले आहे.
नगर तालुक्यातील गुंडेगाव येथून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर जय मल्हार गड कोथुळ (खंडोबा) देवस्थान आहे. अनेक भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या व निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषत: रविवारी गडावर दर्शनासाठी मोठ्या संख्येन भाविक येत असतात.
निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे जागृक देवस्थान तीर्थस्थळ म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर येऊ शकते. या मंदिराच्या वैभवामुळे प्रति जेजूरीचा अनुभव भाविकांना मिळणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने मंदिराचा तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने विकास करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची गरज आहे. सदर देवस्थान तीर्थ क्षेत्र म्हणून विकसीत झाल्यास पर्यटनाला देखील चालना मिळून राज्यातील भाविक दर्शनासाठी येथे येणार आहे. यामुळे पंचक्रोशीतील गावांचा देखील विकास साधला जाऊन स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
जिल्हा प्रशासनाने तात्काळ जय मल्हार गड कोथुळ (खंडोबा) देवस्थान तीर्थक्षेत्र घोषित करुन भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी भालसिंग यांनी केली आहे.