शासकीय सेवेत राहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर बडतर्फ करण्याची मागणी
मेहेकरी विद्यालयात कार्यरत असताना तिसरे अपत्यास जन्म देऊन तो चालवतो खासगी व्यवसाय
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम 2005 चे उल्लंघन करणारे व खासगी व्यवसाय चालविणाऱ्या जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेच्या विद्यालयात कार्यरत असलेल्या व्यक्तीला सेवेतून बडतर्फ केले जात नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सोमवारी (दि.5 फेब्रुवारी) जिल्हा परिषदेत प्रशासनाला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ करण्याचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व जिल्हा सचिव रवींद्र मेढे यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील एका नामांकित संस्थेच्या मेहेकरी (ता. नगर) येथील विद्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी यांना 2010 मध्ये तिसरे अपत्य झाले आहे. त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र) नियम 2005 चे उल्लंघन केले आहे. त्यांची एक मुलगी पुणे येथे शिक्षण घेत असून, दुसरी मुलगी व एक मुलगा शहरातील त्या नामांकित संस्थेच्या हायस्कूल मध्ये शिकत आहे. या व्यक्तीने 2005 नंतर शासकीय सेवेत असताना तिसरे आपत्य जन्माला घातले आहे.
त्याच वेळेस प्रशासनाने त्याला सेवेतून बडतर्फ करणे आवश्यक होते. मात्र त्या व्यक्तीने ही माहिती लपवून शासनाची फसवणुक केलेली आहे. तसेच तो व्यक्ती नातेवाईकांच्या नावे जेसीबी, ट्रॅक्टर, चार चाकी वाहने व डंपर खरेदी करून खाजगी व्यवसाय करत आहे. शासकीय सेवेत असताना खाजगी व्यवसाय करता येत नसताना देखील त्याने सर्व नियमांची पायमल्ली केली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
सदर व्यक्ती विरोधात वेळोवेळी तक्रार करुन देखील जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही. यासाठी प्रशासनाला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ केले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तर शासकीय सेवेत असताना त्या व्यक्तीला तिसरे अपत्य झाल्याने सेवेतून बडतर्फ करावे, 2010 पासून त्यांनी घेतलेले वेतन व्याजासह वसूल करावे व शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.