बारस्कर यांनी राजकारणातून समाजकार्य करताना आपल्या कार्याचा ठसा उमटविला -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने संपत बारस्कर यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, मुख्याध्यापक अनिल आंधळे, राजू बोडखे, प्राचार्य बाबासाहेब शिंदे, तौसिफ शेख, राजू जगताप, प्रा. बंडू गायकवाड, प्रा. अजय भिंगारदिवे आदींसह शिक्षक वर्ग उपस्थित होते.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, सावेडी उपनगरात राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून कार्य करताना संपूर्ण शहरात त्यांचा चांगला जनसंपर्क निर्माण झाला असून, युवक देखील मोठ्या संख्येने त्यांनी पक्षाला जोडले आहे. महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेले बारस्कर यांनी राजकारणातून समाजकार्य करताना आपल्या कार्याचा ठसा उमटविला. अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावून त्यांनी युवकांसह सर्वच क्षेत्रात उत्तमपणे संघटन केले. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी झालेली निवड ही पक्षाला बळकट करुन आमदार संग्राम जगताप यांचा विकासात्मक अजेंडा पुढे घेऊन जाण्यास सक्षम नेतृत्वदायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना संपत बारस्कर म्हणाले की, समाजकारण व राजकारण करताना सुरुवातीपासूनच शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली असून, आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा अजेंडा पुढे घेऊन पक्ष बळकटीकरणासाठी युवकांसह सर्वसामान्यांना जोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.