5 डिसेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा
देशातील समस्त आंबेडकरी जनता व बौध्द अनुयायांचे चैत्यभूमी श्रध्दास्थान
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. तर या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर 5 डिसेंबर पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, दानिश शेख, गुलाम शेख, संदीप वाघचौरे, संतोष पाडळे, विजय शिरसाठ, नईम शेख, अजीम खान, आदिल शेख, सुधीर गायकवाड, हुसेन चौधरी, निशांत शेख आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ असलेले दादर (मुंबई) येथील चैत्यभूमी समस्त आंबेडकर समाजाचे ऊर्जा स्थान आहे. देशातील समस्त आंबेडकरी जनता व बौध्द अनुयायांचे हे एक श्रध्दास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी 6 डिसेंबर रोजी या चैत्यभूमीवर दर्शन घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. या स्मारक स्थळाला महाराष्ट्र शासनाने अ वर्ग पर्यटन स्थळ व तीर्थ स्थळाचा दर्जा 2 डिसेंबर 2016 रोजी दिला आहे. दादर परिसर चैत्यभूमीच्या नावाने ओळखला जात असून, दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याचे संपूर्ण आंबेडकरी जनतेची मागणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या नामांतरासाठी अनेकदा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे. मात्र त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. शासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी व मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. जो नामांतर होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.