• Sun. Jul 20th, 2025

बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या भाजी मार्केटची बदनामी करणाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

ByMirror

Dec 1, 2023

भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शारदा गायकवाड यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

खोट्या तक्रारदारावर कारवाई न करता पोलीस आमच्यावरच गुन्हे दाखल करण्यासाठी धमकावित असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशन संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार गट) त्या पदाधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी असोसिएशनच्या अध्यक्षा तथा भाजप महिला आघाडी अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तर एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून खोट्या तक्रारदारावर कारवाई न करता उडवाउडवीचे उत्तरे देऊन आमच्यावरच गुन्हे दाखल करण्यासंबंधी धमकाविले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


नगर-मनमाड रोड, नवनागापूर येथील सह्याद्री चौक ते गरवारे कंपनी चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला मार्केट हे मागील आठ वर्षापासून चालविण्यात येत आहे. या अगोदर सात वर्षे अशाच पध्दतीने भाजीपाला विक्री सुरु होती. मात्र विक्रीला येणारे शेतकरी वर्ग कचरा मार्केटमध्येच टाकत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरुन दुर्गंधी निर्माण झाली होती. हा बाजार व्यवस्थितपणे चालविण्यासाठी व सोयी-सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटची स्थापना करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट मध्ये स्टॉल लावणारे भाजी, फळ विक्रेत्यांकडून प्रत्येकी 20 रुपये शुल्क आकारुन स्वच्छता व इतर सोयी-सुविधा पुरविण्याचे काम सुरु आहे. नवनागापूर ग्रामपंचायत कार्यालयाकडून स्वच्छतेसाठी ना हरकत घेऊन या परिसराची स्वच्छता करण्यात आलेली आहे. स्वच्छता शुल्कातून मार्केटमध्ये स्वच्छता कर्मचारी नेमून वेळोवेळी स्वच्छता केली जात आहे. तसेच लाईट, पाणीची देखील सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे चांगल्या वातावरणात भाजी-फळ विक्रेत्यांना बसता येत असून, नागरिकांची देखील सोय झाली आहे. तसेच जमा झालेल्या पैश्‍यातून सामाजिक कार्य देखील सुरु आहे. मात्र जातीयद्वेष व पूर्ववैमनस्यातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने भाजी मार्केटमध्ये एमआयडीसी पोलीसांकडे बळजबरीने पैसे वसुल करत असल्याची खोटी तक्रार दिली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


पोलीस प्रशासनाने वस्तुस्थिती लक्षात न घेता खोट्या तक्रार अर्जावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव टाकून खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे. केलेल्या अर्जावर पोहच न देता, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. याप्रकरणी चौकशी करुन भाजी मार्केटची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या (शरद पवार गट) त्या पदाधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन कारवाई करावी व खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्या एमआयडीसी पोलीस निरीक्षकांचे निलंबन करण्याची मागणी शारदा अंतोन गायकवाड यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *