अण्णाभाऊ साठे यांनी दीन-दुबळ्या वंचित समाज घटकाचे नेतृत्व केले -प्रा. माणिक विधाते
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पहार अभिवादन करण्यात आले.
सिद्धार्थनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, ओबीसी विभागाचे अमित खामकर, अंकुश मोहिते, अजय दिघे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, सरचिटणीस अमोल कांडेकर, उपाध्यक्ष निलेश इंगळे, उमेश धोंडे, लहू कराळे, समिर भिंगारदिवे, सागर गुंजाळ, वैभव औटी, बाबासाहेब साबळे, साधना बोरुडे, ऋषी ताठे, अनिल शेकटकर, संतोष नवसुपे, भगवान जगताप, सागर सोबले, भैय्या कांबळे, साहेबराव काते, सुनिल सकट आदी उपस्थित होते.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये दिशादर्शक ठरले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी केलेला संघर्ष न विसरता येणारे आहे. कामगार चळवळ चालवून त्यांनी दीन-दुबळ्या वंचित समाज घटकाचे नेतृत्व केले. आपल्या साहित्यातून समाज जागृतीची ज्योत अण्णाभाऊंनी पेटवली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊंचे नांव अग्रक्रमाणे घेतले जाते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी समाज जागृतीचे कार्य केले. त्यांचे कार्य आजही समाजाला दिशा व स्फुर्ती देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.