शिवाजी महाराजांनी आदर्शवत राज्यकारभाराने रयतेच्या मनावर राज्य केले -संजय खामकर
नगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर, संघटनेच्या सावेडी येथील मुख्य कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, अरुण गाडेकर, संतोष कानडे, मनीष कांबळे, दिनेश देवरे, संतोष कांबळे, रामदास सातपुते, विनोद कांबळे, रुपेश लोखंडे, बाळासाहेब कदम, विनायक केदार, रामेश्वर महापुरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

संजय खामकर म्हणाले की, शिवाजी महाराजांनी अनेक अडचणींवर मात करुन आपल्या शौर्याने स्वराज्य उभारले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योध्दा नव्हे, तर अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांनी आपल्या आदर्शवत राज्यकारभाराने रयतेच्या मनावर राज्य केले. अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे विचार व कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.