सावली दिव्यांग संघटनेची मागणी
जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकार माहिती होण्यासाठी माहिती अधिकार दिन साजरा व्हावा -बाबासाहेब महापुरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हा कायदा देशभरात सन 2005 पासुन लागू करण्यात आला असून, शासनाने वेळोवेळी उचललेल्या पावलांमुळे अल्पावधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरुपात लोकाभिमुख झाला आहे. महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायदयाच्या व्यापक प्रसिध्दीसाठी व प्रभावी अंमलबजावणी करीता शासन स्तरावरुन सर्वतोपरी उपाययोजना करण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या दिवशी माहिती अधिकार अधिनियम या कायदयातील तरतुदी, कार्यपध्दती, विविध दृकश्राव्य माध्यमातून व्यापक प्रसिध्दी देऊन व विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यन्त पोहोचविण्यासाठी शासनाने 28 सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन साजरा करण्याचा शासनाच्या निर्देशानूसार साजरा करण्याची मागणी सावली दिव्यांग संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, महानगरपालीकेचे आयुक्त, पोलीस अधिक्षक तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविदयालये, विदयापिठे व इतर शैक्षणिक संस्थामध्ये माहिती अधिकार या विषयावर आधारीत प्रश्न मंजुषा, चित्रकला, निबंध व वक्क्तृत्व स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजीत करावी यासाठी अशासकिय समाजसेवी संस्थांचा सहयोग घेण्यात यावा. हा उपक्रम व्यापक पातळीवर राबवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असून, जिल्हयात राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा अहवाल जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर करावयाचा आहे.
जनसामान्यांना त्यांचे न्याय व अधिकाराबाबत माहिती होण्यासाठी माहिती अधिकार कायदा प्रभावशाली ठरत असून, माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत जिल्हाधीकारी यांनी पुढाकार घेवुन 28 सप्टेबर हा दिवस माहिती अधिकार दिन साजरा करण्याबाबत व्यापक प्रसिध्दी देऊन जनजागृती करावी. – बाबासाहेब महापुरे (अध्यक्ष, सावली दिव्यांग संघटना)
