मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेने युवकांना आर्थिक पाठबळ देऊन उभे करण्याचे काम केले -अनिल शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत समाजाने नव्याने निवडून आलेल्या सर्व संचालकांवर मोठा विश्वास टाकला आहे. पतसंस्थेने बँकिंग करताना समाजातील होतकरु व गरजू युवकांना आर्थिक पाठबळ देऊन उभे करण्याचे काम केले व समाजाच्या विकासासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून चालना देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत संस्थापक अध्यक्ष इंजि. विजयकुमार ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेल्या राजमाता जिजाऊ सहकार पॅनलच्या सर्व विजयी संचालकांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाप्रमुख शिंदे बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित संचालक इंजि. विजयकुमार ठुबे, बाळासाहेब काळे, किशोर मरकड, लक्ष्मण सोनाळे, उदय अनभुले, व्यवस्थापक अशोक वारकड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठोकचौळे, इंजि. सुजाताताई ठुबे, करुणाताई काळे, महेश लोंढे, मुन्ना शिंदे, ओंकार शिंदे, राज कोंडके, सचिन लोखंडे आदी उपस्थित होते.
पुढे शिंदे म्हणाले की, संस्थापक अध्यक्ष इंजि. विजयकुमार ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पॅनलने हे यश मिळवले असून, अनेक वर्षापासून समाजासाठी ते देत असलेल्या योगदानाची ही पावती आहे. एकहाती सत्ता देऊन सभासदांनी त्यांना काम करण्याची संधी दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना इंजि. विजयकुमार ठुबे म्हणाले की, सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन, समाजाने मोठी जबाबदारी सर्व संचालकांवर टाकली आहे. संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करताना गेल्या बावीस वर्षात निवडणूक झाली नाही. मात्र काहींनी बोट लावण्याचा प्रयत्न केल्याने निवडणूक लादली गेली. समाजाने दाखवलेला विश्वास भविष्यात काम करण्यासाठी आनखी ऊर्जा देणारा आहे. जाहीरनाम्यानुसार एका वर्षात 50 कोटीच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला जाणार आहे. तर येत्या पाच वर्षात 100 कोटीच्या ठेवीचे उद्देश पूर्ण केले जाणार आहे. फक्त ठेवी गोळा करणे व कर्ज देणे याशिवाय विविध सामाजिक कार्य देखील पतसंस्थेच्या माध्यमातून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रत्येक तालुक्यात शाखा निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.