इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी, पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सर्वात मोठा आर्थिक घोटाळा करुन सर्वसामान्यांच्या पैश्याची लूट झाल्याप्रकरणी अदानी-मोदी विरोधात शिवजयंती दिनी रविवारी (दि.19 फेब्रुवारी) राष्ट्रीय लूटबानी सूर्यनामा केला जाणार आहे. इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी, पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने मुळाडॅम येथे हे आंदोलन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकवीसाव्या शतकातील अलेक्झांडर होण्याची महत्त्वाकांक्षा तर गौतम अदानी यांना जगातील सर्वात श्रीमंत होण्याची महत्त्वाकांक्षा राबविताना देशातील सर्वसामान्य नागरिकांचे सुमारे दहा लाख कोटी रुपयांचे नुकसान या घोटाळ्यातून झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
या आंदोलनामध्ये भारतरतन कॉर्पोरेट आंतरराष्ट्रीय मापदंडाचा उपयोग करण्यात येणार आहे. टाटा उद्योग समूह आणि उद्योजक रतन टाटा यांनी जगभर कॉर्पोरेट सेक्टर मध्ये नाव कमविले आहे. त्यांच्या मागे उन्नत चेतनेची प्रेरणा आहे. उद्योजक रतन टाटा यांना यापूर्वी भारत सरकारने भारतरत्न घोषित करणे आवश्यक होते, परंतु चांगल्या उद्योग समुहाला आणि मोठ्या प्रमाणात रोजगार देणार्या प्रामाणिक अशा रतन टाटा यांना केंद्र शासनाने दुर्लक्षित केले असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
गीताभारताच्या शिकवणीमुळे या देशात महान संस्कृती निर्माण झाली आहे. निरंतर राष्ट्रीय कर्तव्ययोग गीतेतून सांगण्यात आला आहे. त्याच वेळेला देशातील लोक, राष्ट्राबाबतची भक्ती आणि आस्था, तर राष्ट्राच्या समस्या सोडविण्याचे तंत्र आणि राष्ट्राचे हित, कर्तव्य निष्काम भावाने पूर्ण करण्यासाठी निरंतर राष्ट्रीय कर्तव्ययोग गीताभारताने दिला आहे. या संघटना शिवजयंतीनिमित्त भारतीय संविधानाला गीताभारताचे क्रायोजनिक इंजिन जोडणार आहे.
शिवाजी महाराजांना श्री कृष्णाची उन्नत चेतना आणि अर्जुनाची तुफान ऊर्जा प्राप्त झाली होती. त्याला गीताभारत कारणीभूत ठरली. त्यामुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करुन आदर्श राज्याची निर्मिती केली. गीताभारत आणि शिवाजी महाराज यांचे अतूट नाते जगासमोर आणण्यासाठी शिवजयंती उत्साहात साजरी करुन लुटारुंचा सुर्यनामा केला जाणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या उपक्रमासाठी अॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. महेबुब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.
