• Mon. Jun 2nd, 2025

वेतन पथक अधीक्षक कार्यालयातील अनागोंदी थांबवावी

ByMirror

Sep 10, 2022

वेतन पथक अधीक्षक कार्यालयाकडून कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय होत नसल्याचा आरोप

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने घेतली शिक्षणाधिकारी यांची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबीत प्रश्‍नांची सोडवणूक करावी व वेतन पथक अधीक्षक कार्यालयातील अनागोंदी थांबविण्यासाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांची भेट घेऊन चर्चा केली. तर वेतन पथक अधीक्षक कार्यालयाबद्दल शिक्षकांकडून अनेक तक्रारी असून, ते त्वरीत न थांबल्यास शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार घेऊन जाणार असल्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे, नंदकुमार शितोळे, देवीदास पालवे, रमाकांत दरेकर, बद्रीनाथ शिंदे, प्रसाद साठे, दिपक दरेकर, अर्जुन भुजबळ, रामकृष्ण डांगे आदींसह शिक्षक उपस्थित होते.


जिल्ह्यात शिक्षक-शिक्षकेतरांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असून, अनेक वेळा भेटून चर्चा करून प्रश्‍नासंदर्भात निपटारा झाला नसून, वेतन पथक अधीक्षक कार्यालयाकडून कोणतेही काम पैसे घेतल्याशिवाय होत नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. तर याबाबत जिल्हाभरातून शिक्षकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याचे शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी कडूस यांच्यापुढे मांडले. याबाबत त्वरीत वेतन पथक अधीक्षक कार्यालयातील जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करावी व प्रश्‍न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे स्पष्ट करण्यात आले.


सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हप्ता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये पीएफ खात्यामध्ये जमा झाला असून, आपल्या जिल्ह्यामध्ये अजूनही काही तालुक्यात जमा झालेला नाही. मेडिकल बिले काही शिक्षक शिक्षकेतरांना प्राप्त झाली परंतु, अजूनही अनेकशिक्षकांची बिले येणे बाकी आहेत. फरक बिले अजूनही प्राप्त झालेले नाही, त्याबाबत काय कारवाई झाली? निवृत्त शिक्षकांची फरक बिले, आपल्या कार्यालयाकडे जमा झालेली आहे. ती संबंधित शिक्षक शिक्षकेतरांना कधी प्राप्त होतील? दप्तर दिरंगाई बाबत अनेकवेळा तक्रारी करुन त्याबाबत योग्य निर्णय घेतला जात नाही. तीन महिन्यापूर्वी लेखी पत्र देऊन तसेच तोंडी मागणी करून पगार बिलाचे स्क्रोल अद्याप पर्यंत प्राप्त झालेले नाही. पे युनिटमधील अनागोंदी कारभारावर अनेक वेळा चर्चा होऊनही बदल होत नाही. मागील आंदोलनात कार्यालयासमोर फलक लावण्या संदर्भात चर्चा झाली, परंतु कर्मचारी भेटी संदर्भात अद्यापही फलक लावण्यात आलेले नाही. या सर्व प्रश्‍नांचा खुलासा करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *