महाराष्ट्र राज्य किसान सभेची मागणी
शेतकर्यांना विना विलंब, विनाअट नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करुन, शेतकर्यांना विना विलंब, विनाअट नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. बन्सी सातपुते यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापुस, सोयाबीन सारखे पिक संपुर्णपणे नष्ट झालेले आहे. लंम्पी सारख्या आजाराला शेतकर्यांचे पशुधन बळी पडलेले आहे. विमा कंपन्या पिक कापनीच्या नावाखाली तांत्रिक मुद्दे उपस्थित करुन विमा धारक शेतकर्यांना लाभापासून वंचित ठेवत आहे. शेतकर्यांच्या पिकाचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. हे विमा कंपन्या व सरकारला माहिती आहे. प्रशासनाने कंपन्याऐवजी शेतकर्यांच्या बाजूने उभे राहण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
कुठल्याही तांत्रिक बाबीत न अडकता विमा कंपन्यांनी विमा धारक शेतकर्यांना शंभर टक्के विमा भरपाई द्यावी, ज्या शेतकर्यांनी विमा घेतलेला नाही त्या शेतकर्यांना हेक्टरी एक लाख रुपये शासनाने भरपाई देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सरकारने तातडीने विमा कंपन्या व प्रशासनाला आदेश द्यावे, अन्यथा तीव्र शेतकरी आंदोलन छेडले जाणार असल्याचे कॉ. बन्सी सातपुते यांनी म्हंटले आहे.
