भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याचा आरोप
चरणबध्द आंदोलनाचा पहिला टप्पा
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात मोदी प्रणित भाजप सरकार संविधानद्रोही कृत्य करत असल्याच्या निषेधार्थ भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने चरणबध्द आंदोलनातंर्गत जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकार लोकशाही विरोधी व जातीयवादाला खतपाणी घालणारी असल्याचा आरोप करुन भाजप विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात डॉ. भास्करण रणनवरे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोसले, संजय कांबळे, डॉ. प्रदीप चांदणे, अशोक म्हस्के, प्रा. लक्ष्मण जाधव, एकनाथ गायकवाड, विलास साठे, अशोक साळवे, रमेश गायकवाड, कन्हैय्या इट्टम, रमेश गायकवाड, गणपत मोरे, राम मगरे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशार्याने केंद्रातील भाजप सरकार चालत आहे. उत्तर प्रदेशासह इतर राज्यात भाजप सरकार संविधानद्रोह करत आहे. ओबीसी, आदिवासी, मागासवर्गीय यांना बळजबरीने हिंदू बनविण्यात येत असून, निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने यावेळी करण्यात आला. ओबीसी व इतर मागासवर्गीय यांची जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात चरणबध्द आंदोलन सुरु असून, प्रत्येक जिल्हास्तरावर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातंर्गत 25 ऑक्टोबरला उपोषण, 31 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तर 6 नोव्हेंबरला राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन केले जाणार आहे.