हुकुमशाही व धर्मांधतेविरोधात आंबेडकरी विचार स्विकारण्याचे आवाहन
हुकूमशाहीच्या प्रवाहात लोकशाही बद्दलचे बाबासाहेबांचे विचार अंतर्मुख करणारे -उमाशंकर यादव
अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर यावेळी हुकुमशाही, धर्मांधतेविरोधात आंबेडकरी विचार स्विकारण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे, जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, शहराध्यक्ष संतोष जाधव, जिल्हा प्रभारी बाळासाहेब मधे, शहर सचिव राजू गुजर, शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ पाटोळे, प्रतीक जाधव, शहर प्रभारी संजय डहाणे, मयूर भिंगारदिवे, आकाश जंजाळ, बाळासाहेब गायकवाड, बाळू वनकर, भगवान जगताप, विकास कुमार, सोहन सिंग, मिलिंद पगारे, ललित गुजर, सुनील गायकवाड, योहान गायकवाड, माजी जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, मनोज उबाळे, मनोज विधाते, विजय शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव म्हणाले की, देश हुकूमशाही कडे वळत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाही बद्दलचे विचार प्रत्येक भारतीयांना अंतर्मुख करणारे आहेत. स्वातंत्र्योत्तर प्रदीर्घ कालावधीत राष्ट्रीयत्व हा धर्म व संविधान हाच राष्ट्रग्रंथ मानला गेला. मात्र सध्याच्या सत्ताधार्यांना देशापेक्षा धर्माचे प्रश्न अधिक जिव्हाळ्याचे तर जनसामान्यांपेक्षा भांडवलदारांचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहे. देशाला महान राज्यघटना असली तरी, ती राबवून घेण्याची धमक नागरिकांमध्ये निर्माण झाल्यास खर्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराध्यक्ष संतोष जाधव यांनी सत्ताधारी बाबासाहेबांनी धार्मिक विषमते विरोधात लढा देऊन प्रस्थापित केलेल्या समत व बंधुत्वाला सुरुंग लावण्याचे काम करत आहे. राज्यकर्त्यांकडून मानवतावादी दृष्टिकोनातून संविधानाची अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. यासाठी बाबासाहेबांचे विचार अंगीकारण्याची गरज असल्या त्यांनी सांगितले.
