• Wed. Jun 4th, 2025

मानव जातीच्या कल्याणासाठी ब्रह्मांडसुसंगत जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन

ByMirror

Jun 2, 2025

पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार; ब्रह्मांडाचा जागर: मानवतेसाठी आत्मचिंतनाची आणि कृतीची वेळ

कॉस्मिक गव्हर्नन्स आणि कॉस्मिक लोकशाही निसर्गनिष्ठ शासनाची नवी दिशा

नगर (प्रतिनिधी)- आज मानवी समाज एका अत्यंत निर्णायक टप्प्यावर उभा आहे. हवामान बदल, जलसंकट, जैवविविधतेचा ऱ्हास आणि पर्यावरणीय आपत्ती या काही निव्वळ शास्त्रीय किंवा आकस्मिक घटना नाही, तर या ब्रह्मांडशक्तीने दिलेले इशारे आहेत. आता फक्त राष्ट्रनिर्मित धोरणे पुरेशी नाहीत; आवश्‍यक आहे ती कॉस्मिक गव्हर्नन्स व कॉस्मिक लोकशाही ज्यामध्ये निसर्ग हा सर्वोच्च शासक व कायदादाता मानला जाणार असून, त्याच्या अंमलबजावणीचे आवाहन पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आले आहे.


कॉस्मिक गव्हर्नन्स म्हणजे निसर्गनिष्ठ ब्रह्मांडशासन. या कल्पनेनुसार, ब्रह्मांड हे यंत्रवत नाही, तर चेतन, सजीव आणि सजग आहे. त्याचे नियम फक्त वैज्ञानिक नाहीत तर नैतिक आणि आध्यात्मिकही आहेत. निसर्ग हाच सर्वोच्च राज्यकर्तामानवी कायद्यांपेक्षा मोठा आहे. ब्रह्मांडाचे कायदे म्हणजे पर्यावरण, जीवशास्त्र व भौतिकशास्त्राचे नियम असून, या नियमांचे उल्लंघन म्हणजे ब्रह्मांडाच्या न्यायालयात गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


जसे जंगलतोड, नदीप्रदूषण, जमिनीवर सिमेंटकरण आणि हवामान बिघाड हे निष्कलंक निसर्गविरोधी कृती आहेत, तशीच त्यांची फळे म्हणजे वणवे, पूर, दुष्काळ आणि रोगराईहे केवळ परिणाम नाहीत, ते नैसर्गिक न्याययंत्रणेची शिक्षा असल्याचे म्हंटले आहे.
कॉस्मिक लोकशाही म्हणजे केवळ माणसापुरती नव्हे, तर संपूर्ण जीवसृष्टीला न्याय देणारी प्रणाली. येथे नद्या, जंगलं, प्राणी आणि भविष्यातील पिढ्यांना समान नागरी हक्क असतात. पृथ्वी ही मालमत्ता नव्हे, ती आपले कर्तव्य आहे. सर्व धोरणे निसर्गाच्या कायद्याशी सुसंगत असावीत. प्रत्येक व्यक्ती ही केवळ मतदार नाही, तर ब्रह्मांडाची विश्‍वस्त आहे.ही लोकशाही भक्ती, ज्ञान आणि कर्म या त्रिसूत्रीवर उभी आहे, जी केवळ राजकीय नव्हे, तर आध्यात्मिक सुधारणेचा मार्ग असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे.


या तत्त्वज्ञानाला कृतीत उतरवण्यासाठी निसर्गपालन हे सर्वोच्च धर्मकार्य आहे. रेन बॅटरी तंत्रज्ञानाने पावसाचे पाणी साठवून भूजल पुनर्भरण, धनराई फळबाग योजना कोरडवाहू भागात फलोत्पादन वाढवणे, ट्री-रूट, रूफटॉप व बोअरवेल बॅटऱ्या वृक्षांच्या मुळांभोवती ओलावा टिकवणे, एकात्म ज्ञानसिद्धांत विज्ञान, तत्त्वज्ञान व आत्मज्ञानाचे एकत्रित शिक्षणमोठ्या प्रमाणात झाडे लावणे, प्रत्येक पावसाच्या थेंबाचे संरक्षण, नद्यांना आणि वाऱ्यांना देवतेप्रमाणे मानणे, मातीला आणि पाण्याला पूजणे, ही ब्रह्मांडाची आमच्याकडून असलेली अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
ब्रह्मांड शासक आहे, न्यायाधीशही आहे. आता वेळ आली आहे की मानवजात एकत्र येऊन स्वीकारेल. ब्रह्मांड हे सजीव आणि सजग आहे. ते नैसर्गिक नियमांनी शासित आहे. त्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा निश्‍चित आहे. सुसंवादी वर्तन करणाऱ्यांना ते आशीर्वाद देते. आपली शहरे, शेती, उद्योग, शिक्षण आणि कायदे आता ब्रह्मांडनिष्ठ आणि निसर्गकेंद्रित असावेत. हे फक्त आदर्श तत्त्वज्ञान नाही ही भविष्यासाठीची अत्यावश्‍यक दिशा मानव जातीच्या कल्याणासाठी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *