रस्ता असताना सुध्दा मयतांना प्रतिवादी करुन शेतातून रस्ता काढण्यात आल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- महसुल विभागाने दिलेल्या चुकीच्या निर्णयाविरोधात न्याय मिळण्यासाठी कर्जुने खारे (ता. नगर) येथील शेतकरी बाळासाहेब ढवळे यांनी शनिवार (दि.24 सप्टेंबर) पासून अहमदनगर ते मुंबई मंत्रालय पायी न्याय-हक्क दिंडी काढण्याचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन धनदांडग्यांच्या दबावाखाली न्याय विक्रीने शेतकर्यांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले आहे. चुकीच्या निर्णयाने किती शेतकर्यांनी आत्महत्या कराव्या? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

बाळासाहेब ढवळे यांचे कर्जुने खारे (ता. नगर) येथे शेतजमीन असून, ते अल्पभूधारक आहे. गट नंबर 126 व 127 तसेच 124 व 125 मध्ये रस्ता असताना सुद्धा रावसाहेब सोनवणे या धनदांडग्या व्यक्तीने आपल्या स्वार्थासाठी गट नं. 125 व 126 मधून दुसरा बेकायदेशीर रस्ता महसूल अधिकार्यांना हाताशी धरुन व पोलिसांच्या दडपशाहीने 18 एप्रिल रोजी काढला आहे. या प्रकरणात प्रतिवादी नसताना देखील अन्यायकारक पध्दतीने रस्ता काढण्यात आला असून, या प्रकरणात तहसीलदारांनी चक्क मयतांना प्रतिवादी केले आहे. शेतातून रस्ता काढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. रस्ता काढण्यास विरोध केला असता सरकारी कामात अडथळा आनल्याचा खोटा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. कायद्याचा दुरोपयोग करुन एका शेतकर्यावर अन्याय करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन पाठवून 27 जुलै 2022 रोजी नाशिक आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तेथील पोलीसांनी उपोषण करु देता बळाचा वापर करुन हुसकावले. न्याय मागण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन देखील करु दिले जात नसल्याने मुंबई मंत्रालय पर्यंत न्याय-हक्क दिंडी काढणार असल्याचे ढवळे यांनी म्हंटले आहे.
धनदांडग्यांच्या दबावाखाली येऊन महसूल अधिकारी व पोलिसांच्या चुकीच्या वागण्यामुळे शेतकरी आत्महत्येस बळी पडत असून, त्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. संबंधित अधिकार्यांवर खात्यानुसार चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकरी ढवळे यांनी केली आहे. या प्रकरणात कारवाई झाल्यास यापुढे कोणत्याही शेतकर्यांवर महसूल अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्याकडून अन्याय होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री यांना देखील पाठविण्यात आलेले आहे.
