कर्डीले यांनी नेहमीच सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व व्यापारी वर्गाचे नेतृत्व केले -जनक आहुजा
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी शिवाजी कर्डीले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा घर घर लंगर सेवेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी लंगर सेवेचे जनक आहुजा, हरजितसिंह वधवा, राजेंद्र कंत्रोड, कैलाश नवलानी, विजय गुंदेचा आदी उपस्थित होते.
जनक आहुजा म्हणाले की, सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी वर्ग, बचत गट यांना आर्थिक बळ देण्याचे काम जिल्हा बँकेने केले आहे. माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी नेहमीच सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी व व्यापारी वर्गाचे नेतृत्व करुन त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांच्या हातून सर्वसामान्य शेतकरी वर्गाची सेवा घडणार असल्याचे त्यांनी सांगितले. हरजितसिंह वधवा यांनी जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा बँकेची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मोठा कष्टकरी व शेतकरी वर्ग बँकेला जोडलेला असून, बँकेच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम कर्डीले यांच्या माध्यमातून होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना शिवाजी कर्डीले यांनी लंगर सेवेने कोरोना काळात सर्वसामान्य घटकांना दिलेला आधार प्रेरणादायी आहे. कोरोना काळानंतरही त्यांची सेवा सुरु असून, सेवाभावाने केलेली कामे जनतेच्या मनात कोरली जातात. बँकेच्या माध्यमातून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन त्यांना आधार देण्याचे काम केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.