पेन्शनवाढचा प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी निदर्शने
दिवसभर रंगले भजन-कीर्तन व प्रवचन
अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शनर्सची पेन्शन वाढ होण्यासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित करुन हा प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती व ईपीएफ 95 पेन्शनर कल्याणकारी संघटनेच्या (महाराष्ट्र राज्य) वतीने मंगळवारी (दि.4 एप्रिल) शहरातील पॉलिटेक्निक महाविद्यालय येथील खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात पेन्शन वाढ करण्याच्या मागणीच्या जोरदार घोषणा देण्यात आला. तर दिवसभर चाललेल्या या सत्याग्रहात प्रवचनासह भजन-कीर्तनही रंगले होते.
या आंदोलनात ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीचे पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, जिल्हा अध्यक्ष संपत समिंदर, उपाध्यक्ष एस.के. सय्यद, शहराध्यक्ष संजय मुनोत, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भगवंत वाळके, महिला आघाडीच्या अध्यक्षा आशाताई शिंदे, श्रीगोंदा शहराध्यक्ष डॉ. हौसाराव गाडेकर, शहराध्यक्ष संजय मुनोत, उपाध्यक्ष प्रकाश गायखे, राहता तालुकाध्यक्ष सुखदेव आहेर, नामदेव धालवडे, जालिंदर शेलार, अजितराव भोसले, शांताराम तरटे, विठोबा वाघस्कर, हरीभाऊ धारकर, जालिंदर शेलार आदींसह मोठ्या संख्येने ईपीएस 95 पेन्शनर्स सहभागी झाले होते.
या आंदोलनात सकाळी भजनाचा कार्यक्रम रंगला होता. तर दुपारी पेन्शनर ह.भ.प.दशरथ शेलार यांनी प्रवचन केले. ईपीएस 95 च्या पेन्शन वाढ व प्रलंबीत मागण्यांसाठी 27 मार्चच्या बैठकीत निर्णय न घेतल्यास 28 मार्चला श्रमशक्ती भवन येथे आंदोलन करण्याची नोटीस संघटनेच्या वतीने केंद्र सरकारला देण्यात आली होती. मात्र नियोजित आंदोलन सुरू करण्याअगोदरच ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या नेत्यांची धरपकड करून केंद्र सरकारच्या आदेशाने दिल्ली पोलीसांनी आंदोलन चिरडून टाकले. या निषेधार्थ देशातील सर्व खासदारांच्या कार्यालया समोर सत्याग्रह सुरु असल्यचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
70 लाख औद्योगिक, सार्वजनिक, सहकार, खाजगी क्षेत्रातील सेवानिवृत्त ईपीएस 95 पेन्शनधारकांनी देशाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. महागाईच्या काळात अत्यल्प पेन्शनमुळे त्यांना जीवन जगणे अवघड झाले असून, त्यांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे. पेन्शनर्सच्या पेन्शनमधून पती-पत्नीचा वैद्यकीय खर्च देखील भागत नसून, उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. ईपीएस 95 पेन्शनर्सना सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन वाढ करावी, पती-पत्नींना जीवन जगण्यासाठी किमान साडेसात हजार रुपये पेन्शन व महागाई भत्ता देण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार भेदभाव न करता सर्वांना हायर पेन्शन लागू करावी, पेन्शनर्स दांम्पत्यांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
पेन्शनमध्ये वाढ व्हावी व पेन्शनर्सना महागाईच्या काळात जगता यावे, या एकमेव ध्येयाने आंदोलन सुरु आहे. खासदारांना अनेक वेळा याबाबत निवेदन देण्यात आले. ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या माध्यमातून केंद्रीय कामगार मंत्री, अर्थमंत्री व पंतप्रधान यांना भेटून हा प्रश्न मांडला, त्यांनी प्रश्न सोडविण्याचे मान्य देखील केले. मात्र यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे खासदारांच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह सुरु आहे. आंदोलनच होऊ नये, ही केंद्र सरकारची भूमिका हुकुमशाही पध्दतीची असून, अशी परिस्थिती राहिल्यास भविष्यात देशामध्ये न्याय-हक्क मागण्यासाठी अवघड परिस्थिती निर्माण होणार आहे. -सुभाषराव पोखरकर (पश्चिम भारत संघटक, ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती)