प्रश्न न सोडविता सत्ताधारीच आंदोलन करत बसले, तर सर्वसामान्यांनी जायचे कुठे?
शहरात नागरिकांच्या डोळ्यात धुळफेकण्याचा प्रकार -दीप चव्हाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांची प्रश्ने न सोडविता सत्ताधारीच आंदोलने करुन नागरिकांच्या डोळ्यात धुळफेक करीत आहे. शिवसेनेचे महापौर होऊन नऊ महिने उलटत असताना शहरातील रस्ते, पाणी, कचरा संकलन आदी प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहे. विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी पक्षच नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलन, मोर्चा काढून जनतेला वेड्यात काढत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी केला आहे. सत्ताधारीच प्रश्न न सोडविता आंदोलन करत बसले तर सर्वसामान्य नागरिकांनी जायचे कुठे? हा प्रश्न उपस्थित करुन त्यांनी महापालिकेत शिवसेनेचे महापौर सक्षम नसल्याने त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात व शहरात राष्ट्रवादी, शिवसेवा व काँग्रेसची आघाडी असून ते सत्ताधारी पक्ष आहे. शहरात भाजप हा विरोधी पक्ष असला तरी, त्याचा सत्ताधार्यांना छुपा पाठिंबा आहे. महापालिकेत सत्ताधारी मधलाच विरोधी पक्षनेता असून, असा प्रकार महाराष्ट्रातील कुठल्याच महापालिकेत नाही. खरा विरोधी पक्ष नेता असता तर त्याने जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविला असता. मात्र अहमदनगर महापालिकेत जनतेला वेड्यात काढण्यासाठी सत्ताधारीच विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेतील मेहेर, लहारे यांना बडतर्फ करण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक व पक्षी संघटनेच्या पदाधिकार्यांनी आंदोलन केले. शहरातील हॉकर्सचे अतिक्रमण काढण्यासाठी सत्ताधार्यांना आंदोलन करावे लागले. 29 मार्च रोजीच्या बजेटच्या सभेत सत्ताधारी शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे नगरसेवक यांनी पाणी प्रश्न व इतर प्रश्नाबाबत महापौरांना प्रश्न विचारले यावर समाधान न झाल्याने सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध दर्शविला. उपनगरमधील राष्ट्रवादी व सेनेचे नगरसेवक यांनी ठेकेदार काम करत नाही, म्हणून आंदोलन करावे लागले. सत्ता असताना प्रश्न न सोडविता त्यातून पळ काढण्यासाठी आंदोलन करण्याचा प्रकार सुरु आहे. केडगाव येथील शिवसेनेचे सत्ताधारी नगरसेवकांनी केडगावकरांच्या पाणी प्रश्नावर लक्ष वेधून, केडगाव पाणी योजनेतून नगर-कल्याण रोड येथील ड्रीमसिटीला दिलेले नळ कनेक्शन तोडण्याची मागणी केली. शहरातील सक्कर चौक अक्षता गार्डन जवळील वॉल चालू करून पाणी चोरी करत असल्याचे उघड करताना शिवसेनेचे नेते विद्यमान नगरसेवक अनिल शिंदे व इतर शिवसैनिक कार्यकर्ते यांनी सत्ताधारी रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. शिवसेना सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका सुवर्णा जाधव यांना पाणी प्रश्नावर महापालिकेवर हंडा मोर्चा काढावा लागला. तर एकीकडे शहर उपनगराच्या पाणी प्रश्नावर अमृत योजनेची आढावा बैठक घेण्याची मागणी सत्तेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, अमोल गाडे व मुजाहिद कुरेशी यांनी निवेदनाद्वारे केली. सत्ताधारी विरोधी पक्षाची भूमिका बजावत असल्याचे, दुर्देवी बाब शहरात पहावयास मिळत असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे.