महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी
जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत त्वरीत सकारात्मक निर्णय व्हावा
अहमदनगर (प्रतिनिधी)- केंद्रातील सरकारी कर्मचारी प्रमाणे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना वाढीव महागाई भत्ता मंजूर करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

केंद्र शासनाने जुलै 2022 पासून कर्मचार्यांना वाढीव महागाई भत्ता दिलेला आहे. परंतू याप्रमाणे महागाई भत्ता राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांना मंजूर करण्यात आलेला नसल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत त्वरीत सकारात्मक निर्णय घ्यावा. जुलै 2022 पासूनचा वाढीव महागाई भत्ता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना मंजूर करण्यासाठी शासन आदेश निर्गमीत करण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
