वडिलोपार्जित देवस्थान परत मिळवून देण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- आजोबांच्या मालकी हक्क असलेली नागापूर, एमआयडीसी येथील रेणुकाई माळ देवस्थान चोरीला गेल्याची तक्रार त्यांचे नातू असलेले अंतोन गायकवाड व शारदा अंतोन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर वडिलोपार्जित देवस्थान परत मिळवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा 3 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा गायकवाड कुटुंबीयांनी दिला आहे.
गायकवाड दांम्पत्यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, नागापूर, एमआयडीसी येथील सर्व्हे नंबर 29/1 ही जमीन आजोबा बाबू रामा, दगडू केसू गायकवाड व माझे नातेवाईक लक्ष्मण ठकू चांदणे यांच्या नावे होती. त्या जमीनीमध्ये ते शेती करुन कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होते. या जमिनीमध्ये रेणुकाईचा माळ देवीचे देवस्थान होते. त्या ठिकाणी मोठे वडाचे झाड आमच्या पंजोबा केसू गायकवाड यांनी लावले होते. देवीची मनोभावी सेवा आजोबा, नातेवाईक, आई वडील व इतर नातेवाईक करीत होते. दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करीत होते. नाशिक येथून रेणुकाईची पालखी आणीत होते व यात्रा उत्सव चांगल्या पध्दतीने साजरा करत होते.
मात्र 21 मे 1971 रोजी अहमदनगर औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन यांनी ही जमीन अधिग्रहण केली. पण माझे आजी आजोबा, नातेवाईक यांनी रेणुकाईचा माळ देवी देवस्थान विकले नव्हते. त्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे नाशिक येथून पालखी आणून नवरात्र उत्सव साजरा करीत होतो. ती जमीन एका कंपनीने एम.आय.डी.सी. कडून विकत घेतली. अशाप्रकारे रेणुकाईचा देवी देवस्थान चोरीला गेले आहे. कुटुंबीय मागासवर्गीय व अशिक्षित असल्याने कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. सध्या त्या जागेत एक कंपनी चालत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.