उमंग फाउंडेशनचा उपक्रम
निरोगी जीवनाचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद -डॉ. धनाजी बनसोडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय आयुर्वेद दिवस नागरिकांच्या निशुल्क आरोग्य तपासणीने साजरा करुन आयुर्वेदाचे महत्त्व सांगण्यात आले. उमंग फाउंडेशनच्या वतीने जुने जिल्हा न्यायालया जवळ अरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले.
आरोग्य अधिकारी डॉ. धनाजी बनसोडे व डॉ. संतोष गिर्हे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उत्कर्ष बहुउद्देशीय संस्थेचे नयना बनकर, पद्मा जाहगीरदार, मधुकर जाहगीरदार, सुरेश मोहिते, स्वाती मोहिते, रित्विक सोनावणे, मेघा राहुल भडांगे, वैशाली बाबासाहेब कुलकर्णी. अॅड. प्रणाली भुयार, अॅड. अनिता दिघे, अॅड. महेश शिंदे आदी उपस्थित होते.
आरोग्य अधिकारी डॉ. धनाजी बनसोडे म्हणाले की, निरोगी आरोग्यासाठी पुन्हा आयुर्वेदाकडे वळावे लागणार आहे. भारताने आयुर्वेद ही जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. झटपट आजार बरे करणार्या इतर औषधांचे दुष्परिणाम शरीरावर होत असतात. आयुर्वेद मात्र मनुष्याच्या सर्व व्याधी व दुर्धर आजार मुळापासून बरे करतो. याचे दुष्परिणाम देखील होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. संतोष गिर्हे म्हणाले की, निरोगी जीवनाचे शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय. जीवनमान बदलल्याने आजार व व्याधी वाढल्या आहेत. आयुर्वेदच्या माध्यमातून अनेक असाध्य रोगावर नियंत्रण मिळवून ते कायमचे नष्ट करता येतात. विविध व्याधींवर मोठ्या प्रमाणात औषधोपचार करुन फरक न पडल्यास शेवटी आयुर्वेदकडे वळताना अनेक रुग्ण दिसत असून, आयुर्वेदातून शंभर टक्के लाभ रुग्णांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिबीरात नागरिकांची तपासणी करुन आयुर्वेद शास्त्र व औषधी पध्दतीचे मार्गदर्शन करण्यात आले.