ऑल इंडिया बीएसएनएल डॉट पेन्शनर्स असोसिएशनची निदर्शने
खाजगीकरणाच्या धोरणामुळे पेन्शनर्सचे भविष्यातील जीवन धोक्यात -आप्पासाहेब गागरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचार्यांच्या प्रलंबीत विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.24 एप्रिल) ऑल इंडिया बीएसएनएल डॉट पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने स्टेट बँक चौकातील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचार्यांनी जोरदार निदर्शने केली.
संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आप्पासाहेब गागरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आर.एन. मंडलिक, विलास कोकरे, राजेंद्र कोकरे, जयश्री त्रिमुखे, भारती बेरड, मेघना देशपांडे, बाजीराव शिंदे, मारुती जाधव, सुधाकर पवार, आप्पासाहेब पवार, कुंडलिक शेळके, तुकाराम पानसरे, पोपट पिंपळे, एस.आर. ठिगळे आदींसह सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचारी सहभागी झाले होते.
आप्पासाहेब गागरे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे पेन्शनर्सचे भविष्यातील जीवन धोक्यात आले आहे. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी सरकारने दखल घेऊन सेवानिवृत्त बीएसएनएल कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बीएसएनएल कर्मचार्यांनी प्रलंबीत मागण्यांसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर देशव्यापी आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने चालवलेली अन्यायकारक कामगार विरोधी धोरण थांबविण्याची मागणी उपस्थितांनी व्यक्त केली. तर या मागण्यांसाठी 29 जुलै रोजी केंद्र सरकार विरोधात दिल्लीमध्ये देशव्यापी मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
1 जानेवारी 2017 पासून रखडलेल्या पेन्शन रिविजन 15 टक्के फिटमेंट सहित सर्व बीएसएनएल सेवानिवृत्त कर्मचार्यांना मिळावी, कोरोना काळातील 18 महिन्याचा थकीत आयडीए ताबडतोब मिळावा, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये सीजीएचएस साठी दवाखाना उघडण्यात यावा, संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीनुसार सर्व केंद्रीय कर्मचार्यांना फिक्स मेडिकल भत्ता 1 हजार ऐवजी रुपये तीन हजार प्रतिमाह मिळावा, रेस्टोरेशन ऑफ फुल पेन्शन 15 वर्षा ऐवजी 12 वर्षे मर्यादा करण्यात यावी, सर्व केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचार्यांना विमा योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.