दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल बच्चू कडू यांचा सत्कार
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानातून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या शिष्टमंडळाने मुंबई मंत्रालयात आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तर महापालिकेतील दिव्यांग कक्ष ताबडतोब सुरु होण्याची मागणी केली.
दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाच्या प्रमुखपदी बच्चू कडू यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यावेळी पुणेरी पगडी घालून व पेढा भरवून सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय बाफना, डॉ. प्रेरणा दिघे, माजी अधिष्ठाता प्रभाकर पवार, प्रहारचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे आदी उपस्थित होते.
आमदार कडू यांनी महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून दिव्यांग कक्ष सुरु करण्याच्या सूचना केल्या. तसेच शिष्टमंडळाने जिल्ह्यातील दिव्यांगांच्या अडीअडचणी त्यांच्या समोर मांडल्या. यावर आमदार कडू यांनी येत्या दोन महिन्यात दिव्यांगांच्या प्रलंबीत प्रश्न व अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती अॅड. पोकळे यांनी दिली.
राज्यातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या निमित्ताने एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती दव्यांग कल्याण विभाग मंत्रालयचे सचिव अभय महाजन यांनी दिली. तसेच यावेळी महाजन यांचा देखील संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला
