• Wed. Feb 5th, 2025

जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमाच्या दिंडीचे भिंगारला उत्साहात स्वागत

ByMirror

Jun 25, 2022

दिंडीच्या आगमनाने भाविक भारावले

अहमदनगर (प्रतिनिधी)- जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमची आषाढी वारीसाठी अनाथ मुले व वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसह पंढरपूरला निघालेल्या दिंडीचे भिंगारमध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी स्वागत केले. स्वागत कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप उपस्थित होते.


दिंडीचे प्रमुख असलेले तपस्वी स्वामी वासुदेवनंदगिरी (बहरुपी) महाराज यांचे पूजन व सत्कार करुन दिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी आश्रमचे सचिव ह.भ.प. दिलीप गुंजाळ, ह.भ.प. लखन महाराज, ह.भ.प. देवदत्त शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब खेडकर आदींसह वारकरी, टाळकरी, विणेकरी व भजनी मंडळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नाशिक जिल्ह्यातील लासळगाव येथे तपस्वी स्वामी वासुदेवनंदगिरी (बहरुपी) महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम व वृध्दाश्रम चालवला जात आहे. आश्रमच्या माध्यमातून 98 मुलींचे तर 56 अनाथ मुलांचे विवाह करण्यात आले असून, सध्या आश्रमात 97 अनाथ मुले-मुली व 25 वृध्दांचे सरकारी अनुदान नसताना पालण पोषण केले जात आहे. आश्रमातील अनेक अनाथ मुले हभप व किर्तनकार तसेच मोठ्या आयटी कंपनीत नोकरी लागलेली आहे. दरवर्षी अनाथ मुले व ज्येष्ठ नागरिकांसह आषाढीच्या वारीसाठी दिंडी काढण्यात येत असल्याची माहिती ह.भ.प. दिलीप महाराज गुंजाळ यांनी दिली.


स्वामी वासुदेवनंदगिरी (बहरुपी) महाराज यांनी जगात माणुसकी हा सर्वात मोठा धर्म असून, वंचित, अनाथांसाठी आश्रमचे दारे उघडे आहेत. अनेक अनाथ बालकांना आधार देऊन त्यांना घडविण्यासह त्यांचे लग्न लावण्यापर्यंत कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी आश्रमचा माध्यामातून दीन-दुबळ्यांची सुरु असलेली सेवा प्रेरणादायी आहे. माणुसकीच्या भावनेने सुरु असलेले सेवा कार्य पाहून या दिंडीत साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर पंढरपूरला जाताना अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर चालताना काळजी घेण्याबाबत सूचना केल्या. ह.भ.प. देवदत्त शेंडे यांच्या वतीने मागील 18 वर्षापासून भिंगारमध्ये या दिंडीच्या जेवणाची सोय केली जाते. यावेळी दिंडीतील वारकरी व मुलांना शेंडे यांच्या वतीने उपवासाचे जेवण व सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांच्या वतीने फळांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *