जिल्हा उद्योग केंद्राने घेतले निर्यातदारांचे संमेलन व एक दिवसीय कार्यशाळा
नव उद्योजक व निर्यातदारांना मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योजकांनी निर्यातदार व्हावे, असे झाल्यास स्वत:चा व देशाचा विकास साधला जाणार आहे. अनेक युवकांना रोजगाराच्या संधी औद्योगिक क्षेत्राकडून मिळत असून, युवकांनी देखील नोकरी मागे न पळता औद्योगिक क्षेत्राकडे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांनी केले. तर नगर जिल्हा निर्यात आराखडा, जिल्ह्यातील निर्यातीची सद्यस्थिती व संधी याबाबत सविस्तर त्यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर यांच्यामार्फत निर्यातदारांचे संमेलन व एक दिवसीय कार्यशाळा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अॅण्ड ऍग्रिकल्चर अहमदनगर शाखा येथे पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना दवंगे बोलत होते. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरविंद पारगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी एमसीसीआयए पुणेचे श्रीराम जोशी, सोनल फडणीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यातील निर्यातदारांना लाभ होण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स पुणे या ठिकाणी सुरु झालेल्या डिजिटल सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन प्रणालीचे प्रकाशन यावेळी पाहुण्यांच्या हस्ते झाले. पारगावकर यांनी नव निर्यातदारांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच मिथिलेश पांडे (जीजेईपीसी), सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे विभागीय अधिकारी श्रीमती सारस्वत मॅडम, सेंट्रल एक्साइजचे उपसंचालक दिनेश नानल, सेंट्रल जीएसटीचे अधीक्षक विजय राऊत, आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया, विनायकराव भुसारे पाटील अध्यक्ष (आय.आय.सि.आय.ए.), संजय गोडे (सिडबी), प्रमोद वाघमारे, निलेश चव्हाण यांनी उपस्थितांना निर्यातीच्या विविध संधीवर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी निर्यातदार, नवनिर्यातदार, उद्योजक, शेतकरी तसेच विविध खात्यांचे अधिकारी व बँक अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तात्यासाहेब जिवडे यांनी केले. आभार अशोक बेनके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अधिकारी प्रदीप बागुल, व्यवस्थापक बालाजी बिराजदार, रविराज भालेराव, जिल्हा उद्योग केंद्रातील सर्व कर्मचारी, व खादी ग्रामोद्योग मंडळाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

