समर्थक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचा जल्लोष
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे बुधवारी (दि.9 जुलै) रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये उज्वला सागर कापसे बहुमताने सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यांची निवड होताच ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात समर्थक असलेले ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी फटाक्याची आतषबाजीत गुलालाची उधळण करुन जल्लोष केला.
निमगाव वाघा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच लता अरुण फलके यांनी मागील महिन्यात राजीनामा दिला होता. रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी बुधवारी सकाळी निवड प्रक्रिया ग्रामपंचायतमध्ये पार पडली. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून नेप्तीचे मंडळ अधिकारी प्रताप कळसे हे उपस्थित होते. त्यांना ग्राम महसुल अधिकारी विनायक दिक्षे, ग्रामपंचायत अधिकारी प्रविण पानसंबळ यांनी सहकार्य केले.
सरपंच पदासाठी उज्वला सागर कापसे व सुजाता ज्ञानदेव कापसे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. दोन अर्ज प्राप्त झाल्याने हात वर करुन मतदानाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी उपस्थित असलेल्या 9 सदस्यांपैकी 8 सदस्यांचे मतदान उज्वला कापसे यांना मिळाल्याने त्यांची सरपंच पदासाठी निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच किरण जाधव, ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, प्रमोद जाधव, मुन्नाबी शेख, दिपक गायकवाड, रुपाली जाधव, अलका गायकवाड आदी उपस्थित होते.
नुतन सरपंचपदी उज्वला कापसे यांची निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंचपदी निवड झाल्याबद्दल कापसे यांचे सोसायटीचे माजी चेअरमन अंशाबापू फलके, दुध डेअरीचे चेअरमन गोकुळ जाधव, अनिल डोंगरे, सोसायटीचे चेअरमन बाळू जाधव, एकनाथ जाधव, जयराम जाधव, संतोष कापसे, अशोक कापसे, भिमराज कापसे, सिध्देश्वर जाधव, मच्छिंद्र कापसे, अजय ठाणगे, बापू फलके आदींनी त्यांचे अभिनंदन केले.