• Fri. Mar 14th, 2025

शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल

ByMirror

Aug 31, 2024

222 व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गातील बाधित शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट

वाढीव नुकसान भरपाई मिळण्यासाठी मागील सहा वर्षापासून संघर्ष सुरु

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या जमीनीला भाव न मिळावा या गैरहेतूने प्रशासनाची दिशाभूल केली जात असताना राष्ट्रीय महामार्ग 222 व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग मध्ये बाधित झालेल्या मौजे केडगाव, निंबळक, बोल्हेगाव, नालेगाव, नेप्ती, सोनेवाडी, पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, मांजरसुंबा व कापूरवाडी येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सर्व गावातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर तालुक्यातील मौजे केडगाव, निंबळक, बोल्हेगाव, नालेगाव, नेप्ती, सोनेवाडी, पिंपळगाव माळवी, धनगरवाडी, मांजरसुंबा व कापूरवाडी येथील शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग 222 व सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्ग मध्ये जमिनी गेल्या आहेत. शेतकऱ्यांनी जमिनीचे वाढीव नुकसान भरपाईचे दावे दाखल करून 6 वर्षे झाली असून, अद्याप शेतकऱ्यांना त्याचा निकाल देऊन लाभ मिळालेला नाही.


सदर दावे शेतकऱ्यांनी एएमएस कन्सलटन्स यांच्याकडे दिले असून, शेतकऱ्यांची त्यांच्या बाबत कुठलीही शंका नाही. कन्सलटन्स कडून कशाचीही मागणी करण्यात आलेली नसून, शेतकऱ्यांनी देखील त्यांना काही दिलेले नाही. सदर प्रकरणी काही विघ्नसंतोषी प्रवृत्तीच्या लोकांनी शेतकरी वर्गाला मदत करणाऱ्या एएमएस कन्सलटन्स यांची बदनामी करण्याचे षडयंत्र बनवले असून, ते त्यांना टारगेट करत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांची बदनामी केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व रोष पसरला असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.


सर्व गावच्या बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांना निवेदन देऊन शेतकरी विरोधी निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जे व्यक्ती शेतकऱ्यांचा कळवळा करण्याचा आव आणत आहे. सर्व शेतकरी गेली 5 ते 6 वर्षा पासून नुकसान भरपाई मिळण्यासाठी लढत आहेत, मग हे मंडळी काय करत होती? असा प्रश्‍न उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.


सर्व गोष्टी नियमाप्रमाणे मार्गी लागत असताना शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये काही विघ्नसंतोषी लोक माती कालवायचे काम करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तर भविष्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास त्याला शेतकरी विरोधी काम करणारे विघ्नसंतोषी लोक जबाबदार राहणार असल्याचे म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *