हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या 142 व्या हौतात्म्य (स्मृति) दिनी अभिवादन कार्यक्रम
राज्यातील साहित्यिकांचा होणार सन्मान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या 142 व्या हौतात्म्य (स्मृति) दिनाचे अवचित्य अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीने गुरुवार दि. 25 डिसेंबर रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावे दरवर्षी मानाचे राज्य साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रम सोहळा होणार आहे. पुरस्काराचे हे सातवे वर्ष असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे यांनी दिली.
पुरस्काराचा प्रदान सोहळा गुरुवारी सकाळी ठीक 8:30 वाजता राजर्षी शाहू महाराज सभागृह न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अ.नगर येथे संपन्न होणार आहे. राज्यातील नामवंत साहित्यिकांच्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, या कार्यक्रमास साहित्यिक, प्रकाशक, ग्रंथवितरक आणि साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भांडाराचे सभापती व संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सहसचिव मुकेश (दादा) मुळे, भंडाराचे चेअरमन प्रा. रवींद्र देवढे, व्हा चेअरमन सुरेश घुंगाडे, भांडाराचे सर्व पदाधिकारी, संचालक व पुरस्कार समितीचे कार्यकारी समन्वयक प्रा. गणेश भगत यांनी केले आहे.
सातारा येथील विद्या पोळ, बीड येथील दत्ता बारगजे, ठाणे येथील डॉ. संजय दिगंबर जोशी, अकोले येथील प्रा. डॉ. रंजना मधुकर कदम, नाशिक येथील किरण भावसार, ठाणे येथील विद्या विनायक निकम यांच्या साहित्यकृतींना राज्य साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच अमरावती येथील ॲड. डॉ. नीता प्रफुल्ल कचवे यांना विशेष राज्य साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरावरील साहित्य पुरस्कार प्रा. भानुदास रतन बेरड यांना जाहीर करण्यात आला आहे.
