• Sun. Jun 1st, 2025

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात

ByMirror

May 14, 2025

खासदार निलेश लंके यांचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मान


संभाजी महाराजांचा आदर्श म्हणजे विचारांची प्रेरणा -खासदार निलेश लंके

नगर (प्रतिनिधी)- संभाजी महाराजांनी धर्माचे रक्षण करुन स्वराज्यासाठी लढले. स्वराज्यासाठी बलिदानही दिले. संभाजी महाराजांचे बलिदान केवळ शरीराचे नव्हते, तर तो विचारांचा आणि स्वाभिमानाचा त्याग होता. त्यांनी धर्मरक्षणासाठी आणि स्वराज्यासाठी लढा दिला. त्यांचे जीवन हे आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या धैर्याचा आणि निष्ठेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर कोणतीही अडचणीचा सामना करता येणार असल्याचे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले.


निमगाव वाघा (ता. नगर) स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. गावातील परिवार मंगल कार्यालयात पार पडलेल्या या संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार लंके बोलत होते. याप्रसंगी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा सरोज अल्हाट, साहित्यिक भारत सातपुते, संमेलनाचे संयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, कवी संमेलनाचे अध्यक्ष रज्जाक शेख, गीताराम नरवडे, साहेबराव बोडखे, भागचंद जाधव, बाळासाहेब देशमुख, पोपटराव साठे, ॲड. रामदास सूर्यवंशी, दिलावर शेख, राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल, आनंदा साळवे, सोसायटीचे सदस्य अतुल फलके, डॉ. विजय जाधव, रामदास फुले, जालिंदर आतकर, रामदास पवार, संदीप रासकर, देवीदास बुधवंत आदींसह कवी, साहित्यिक, ग्रामस्थ व साहित्य प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


छत्रपती संभाजी महाराज यांच्या ग्रंथाचे पूजन करुन व दीपप्रज्वलनाने संमेलनाचे उद्घाटन झाले. खासदार लंके यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सकाळच्या सत्रापासूनच ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत यांचे परिसंवाद आणि व्याख्याने रंगली होती.


सरोज आल्हाट म्हणाल्या की, कवी, लेखक सामाजिक वास्तवतेचे दर्शन घडवितात. कवीता हा जीवनाला स्फुर्ती व आनंद देत असतात, तसेच महिला सक्षमीकरण्यासाठी ग्रामीण भागातले छोटे-मोठे उद्योग उपलब्ध करून द्यावेत ग्रामीण भागामध्ये वाचनालय आहे पण मुलांना त्याची आवड नाही. त्यांना वाचणाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीकोनाने एक तास वाचनासाठी हे उपक्रम राबविण्याचे त्यांनी आवाहन केले.


भारत सातपुते यांनी जग कशाप्रकारे वागते हे महत्त्वाचं नाही आपण प्रामाणिकपणे वागल पाहिजे, असे सांगून पै. नाना डोंगरे यांच्या सामाजिक व सर्वच क्षेत्रातील निस्वार्थ कार्याचे त्यांनी कौतुक केले. पै. नाना डोंगरे म्हणाले की, ग्रामीण भागातील साहित्य व काव्यप्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीकोनाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज हे स्वयं उत्कृष्ट साहित्यिक होते. त्यांनी विविध भाषांचे सखोल अध्ययन केले होते तसेच अभ्यासपूर्ण ग्रंथनिर्मितीही केली होती. त्यांच्या कार्यातून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांच्या जयंती दिनानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


संध्याकाळच्या सत्रात रंगलेल्या काव्य संमेलनात ज्येष्ठ आणि नवोदित कवींच्या जुगलबंदीने रसिकांची मने जिंकली. विविध सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण आणि राष्ट्रीय विषयांवर सादर करण्यात आलेल्या कवितांना भरभरून प्रतिसाद मिळाला. यावेळी ग्रंथ प्रदर्शनाला देखील साहित्यप्रेमींनी भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले. आभार रज्जाक शेख यांनी मानले.


खासदार निलेश लंके यांचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मान
संमेलनाच्या निमित्ताने खासदार निलेश लंके यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामान्य जनता आणि शेतकरी वर्गाचे प्रश्‍न संसदेत सातत्याने मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी घेतलेला पुढाकार लक्षवेधी ठरल्याने त्यांचा गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *