• Tue. Oct 14th, 2025

जुलै अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अरण तीर्थक्षेत्राच्या विकासाचा होणार शुभारंभ

ByMirror

Apr 29, 2025

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आश्‍वासन

संत सावता माळी क्रांती परिषदच्या वतीने निर्णयाचे स्वागत

नगर (प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ सावता महाराजांच्या अरण तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मंजूर करून 24 जुलै च्या अगोदर सर्व प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींची पूर्तता करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा शब्द ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील संत सावता माळी क्रांती परिषदच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.


शाहू, फुले आंबेडकराच्या महाराष्ट्रामध्ये महापुरुषांच्या स्मारकांसाठी आणि साधूसंतांच्या धार्मिक स्थळांसाठी शासन निधीची कमतरता भासू देणार नसल्याचेही आश्‍वासन जयकुमार गोरे यांनी दिले. तर ही आमची ऊर्जास्थाने, शक्तीपीठे असून यांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.


अरण (ता. माढा, सोलापूर) येथे आयोजित चंदन उटी कार्यक्रम आणि भक्त परिवाराच्या मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. 730 वर्षाच्या धार्मिक परंपरेचा वारसा असणाऱ्या संत सावता महाराजांच्या अरण नगरीचा विकास आजपर्यंत झाला नाही याची खंत व्यक्त करतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाला गती दिल्याचे सांगून या अगोदरच्या सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी निशाणा साधला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव या जन्मठिकाणा चा विकास करण्यासाठी दहा एकर क्षेत्र विकत घेत 145 कोटी रुपये ची तरतूद केली. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कडगुण या जन्मस्थळाचेही स्मारकांमध्ये रूपांतर करण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याची माहिती दिली.


प्रमुख अतिथी तथा इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे यांनी अरणच्या तीर्थक्षेत्रासाठी पाहिजे तेवढा निधी देऊ, पैशाची काळजी करू नका. सावित्रीबाई फुले स्मारकास सुद्धा निधी मंजूर केला आहे. महात्मा फुले यांच्या भिडे वाड्याचा प्रश्‍न कोर्टातून सरकारच्या बाजूने सुटला आहे. यामुळे भिडेवाड्याचा विकास यापुढे होणार आहे. महात्मा फुले यांचा राहते घर फुले वाड्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद सरकारने केली आहे. ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य नागरिक सक्षम झाले पाहिजेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकार यांचे धोरण आहे. ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून पूर्वी फक्त दहा विद्यार्थ्यांना मिळणारी परदेश शिक्षणासाठीची शिष्यवृत्ती वाढवत वाढवत आता 100 वर आणली आहे. त्यासाठी असणारी 20 लाख रुपये मर्यादा 40 लाखापर्यंत नेल्याचे त्यांनी सांगितले.


याप्रसंगी आमदार अभिजीत पाटील, रंजनभाऊ गिरमे, रणजीतसिंह शिंदे, रमेश बारस्कर, शिवाजी कांबळे, भारत शिंदे, निलेश गिरमे, प्रसाद डोके, राजकुमार हिवरकर, संतोष पाटील, मनोहर डोंगरे, शंकरराव लिंगे, प्रकाश गोरे, निशिगंधा माळी, पोपटराव बारवकर, योगेश पाटील यांच्यासह संत सावता महाराजांचे वंशज सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी अमर हजारे, साखरचंद लोखंडे महाराज, आबासाहेब खारे, नगरसेवक अजिनाथ माळी, पांडुरंग शिंदे, सुर्यकांत गोरे, गणेशभाऊ बनकर, संतोष विधाते यांच्यासह नगर जिल्हा व तालुका कार्यालयाचे सर्व अधिकारी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संत सावता माळी महाराज भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आयोजित कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संयोजक प्रभू महाराज माळी यांनी तीर्थक्षेत्राला अ वर्ग दर्जा आणि 100 कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल आणि सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्या म्हणून जयकुमार भाऊ गोरे यांना ग्रामविकास मंत्री आणि अतुलजी सावे यांना कॅबिनेट मंत्रीपदी निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र राज्यातील माळी समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *