22 वर्षाच्या सत्ताबदलनंतर वार्षिक सभेतील सर्व विषय एकमताने मंजूर
नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सुमारे 11 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सभासद यांची कामधेनू असलेल्या अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 82 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि.13 जुलै) शांततेत पार पडली. 22 वर्षाच्या सत्ताबदलनंतर स्वाभिमानी परिवर्तन मंडळाचे सत्ताधारी संचालक मंडळाच्या या पहिल्याच वार्षिक सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील सभासद उपस्थित होते.

बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लॉन मध्ये सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन अर्जुन वाळके, संचालक बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, सुनील दानवे, उमेश गुंजाळ, राजेंद्र कोतकर, सुधीर कानवडे, संभाजी गाडे, किशोर धुमाळ, आप्पासाहेब जगताप, बालाजी गायकवाड, छबु फुंदे, साहेबराव रकटे, शिवाजी लवांडे, बाजीराव अनभुले, अतुल कोताडे, विजय पठारे, सुरज घाटविसावे, वर्षा खिलारी, वैशाली दारकुंडे, उद्धव सोनवणे, सचिन जाधव, सोसायटीचे सचिव स्वप्निल इथापे आदींसह सोसायटीचे माजी चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी जिल्हा सहकारी मंडळाच्या सौ. व्ही.ए. मानकर यांनी कार्यशाळा घेऊन उपस्थितांना सहकार खात्यातील विविध तरतुदी, कलमांची माहिती व कायदे संदर्भात मार्गदर्शन केले. अध्यक्षीय सूचना संचालक महेंद्र हिंगे यांनी मांडली. सुनील दानवे यांनी त्याला अनुमोदन दिले. राष्ट्रगीताने सभेला सुरुवात करण्यात आली. मागील वर्षी मयत झालेले सभासद, शहीद जवान, ज्येष्ठ नेते व इतर सर्व राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रास्ताविकात चेअरमन आप्पासाहेब शिंदे म्हणाले की, काटकसरीने संस्थेचा कारभार सुरू असून, संस्थेचा विकासात्मक दृष्टिकोन ठेऊन संचालक मंडळ कारभार करणार आहे. माध्यमिक शिक्षक सोसायटीने गेल्या आर्थिक वर्षात 7 % या अल्प दराने 995 कोटीचे कर्ज वाटप केले असून, सर्व आवश्यक त्या तरतुदी करून 9 कोटी 89 लाखाचा नफा मिळवला आहे. मागील आर्थिक वर्षामध्ये बँकेचा कॅश क्रेडिटचा व्याजदर वाढलेला असून देखील मागील आर्थिक वर्षापेक्षा यावर्षी बँक कॅश क्रेडिटची उचलही वाढल्या कारणाने कॅश क्रेडिटचे व्याज हे रुपये 3 कोटी 25 लाख इतके कॅश क्रेडिट पोटी जास्तीचे गेलेले असल्याचे स्पष्ट करुन लाभांशात वाढ दिली गेली नसल्याचे स्पष्ट केले.
ठेवीमध्ये वाढ करण्यासाठी ठेवी वाढवा अभियान सुरू केले जाणार आहे. सोसायटीचे कारभात हातात घेतल्यापासून काटकसरीने काम सुरु करण्यात आले असून, मागील वर्षीच्या वार्षिक सभेत हॉलच्या निम्म्या रकमेत हॉल भाड्याने घेतले. तर अहवाल छपाईसाठी देखील दीड लाखा पर्यंत खर्च वाचविण्यात आला असल्याचे सांगितले. तर सर्व सभासदांनी विश्वास टाकून बहुमताने सोसायटीची सत्ता ताब्यात दिल्याबद्दल व्यासपिठावर ते नतमस्तक झाले होते.
सचिव स्वप्निल इथापे यांनी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले. संस्थेच्या कामकाजाविषयीचा अहवाल वाचून मंजूर करण्यात आला. संचालक बाबासाहेब बोडखे यांनी ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचे वाचन करुन पारदर्शक पध्दतीने कारभार करण्यासाठी ऑडिट रिपोर्ट सर्व सभासदांपुढे मांडण्यात आला असल्याचे सांगून ऑडिटरचा खर्च देखील कमी केले जाणार असल्याची सांगितले. तसेच 2 कोटी 47 लाख रुपये गुंतवणुक करुन राबविण्यात येत असलेल्या उत्तम जिंदगी या योजनेची माहिती दिली.
सभासदांपैकी देविदास खेडकर यांनी उत्तम जिंदगी सभासदांसाठी फायद्याची कशी? व ऑडीटर खर्चा संदर्भात प्रश्न उपस्थित केला. यावर चेअरमन शिंदे यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार ही योजना अमलात आणली आहे. सुधारित एनपीए, कर्जावर तरतूद, या योजनेतील सर्व रक्कम व्यवहारात राहणार असल्याची माहिती दिली. तर ऑडिटरचा 10 लाखांनी खर्च कमी करण्यात आला आहे. यापुढे देखील हा खर्च कमी करुन ते पुढील अहवालात सभासदांना दिसणार असल्याचे सांगितले.
संतोष कानडे यांनी शहराचे नामांतर झालेले असताना व शिक्षकांप्रमाणे शिक्षकेतर संस्थेचे सभासद असल्याने सोसायटीचे नामांतर अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर सहकारी सोसायटी असे नामकरण करण्याचा ठराव मांडला. या ठरावाला सर्वांनी मंजूरी दिली. तर काटकसरीने काम सुरु असल्याबद्दल संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव मांडला.
उद्धवराव गायकवाड यांनी या सभेत बाउन्सरला तोंड न देता सहजपणे व्यासपीठावर सभासदांना आपले मत मांडता आल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले. तर संस्था स्थापन केलेल्या संचालकांच्या माहिती अहवालात नमूद करण्याचे सूचना केल्या. भाऊसाहेब जिवडे यांनी सोसायटीत ऑनलाइन पेमेंट व्यवस्था करण्याची सूचना मांडली. भीमराज खोसे यांनी कमीत कमी खर्चात ऑडिट रिपोर्ट करण्याचे व अमोल क्षीरसागर यांनी कर्जाच्या रकमेत वाढ करण्याची मागणी केली.
चेअरमन शिंदे यांनी या सूचनांवर सकारात्मकता दर्शविली. तर पुढच्या वेळेस जास्त लाभांश देण्याचे व कर्ज वाढ करण्याचे आश्वासन दिले. यावेळी रामराव धनवटे, रामदास जंजिरे, इस्माईल शेख, संदीप पानमळकर, गणेश विखे आदींनी सभेत प्रश्न उपस्थित करून विविध सूचना मांडल्या. या प्रश्नांना संचालक मंडळाच्या वतीने समर्पक उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
सभेपुढे असलेले 2025-26 चे अंदाजपत्रक मंजूर करणे, 2024-25 वैधानिक व अंतर्गत लेखापरिक्षकांचा अहवाल वाचून त्याची नोंद घेणे, लेखा परिक्षणाच्या दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे, अहवालात सुचविल्याप्रमाणे उपविधी दुरुस्तीबाबत विचार करुन संमत करणे, 2025-26 सालासाठी वैधानिक व अंतर्गत लेखापरिक्षकाची नेमणुक करणे हे सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. याप्रसंगी माजी संचालक बाळासाहेब राजळे, सुरेश मिसाळ, ज्ञानेश्वर काळे, बाळासाहेब सोनवणे, कल्याण ठोंबरे, सत्यवान थोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर कानवडे यांनी केले.