ताशी 130 कि मी वेगाने धावली रेल्वे
अहमदनगर (प्रतिनिधी)- मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत पुणतांबा ते कान्हेगाव 8.66 कि.मी. अंतराची नवव्या टप्प्याची चाचणी मंगळवारी (दि.2 जुलै) यशस्वी झाली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
या पूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या पुर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा, बेलापूर ते पढेगाव, निबळक ते वांबोरी या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता नुकतेच पुणतांबा ते कान्हेगाव 8.66 कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता एकूण 115 कि.मी अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती उप मुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली .

मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्व पूर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासोनतास रेल्वे गाडी एकाच जाग्यावर थांबून ठेवावी लागत होती. मात्र आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाडयांचा थांबा आता बंद होणार आहे. पुणतांबा ते कान्हेगाव या द्रुतगती रेल्वे मार्गावर मध्ये गोदावरी नदी वरील लांबी 288 मीटर व उंची 18 मीटर लांबीचा असलेला सर्वात मोठा पुल बांधण्यात आला आहे. हा रेल्वे पुल बनवण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला असून, नगर ते मनमाड रेल्वे द्रुतगती मार्गा मधील सर्वात मोठया लांबीचा व उंचीचा पूल असून या पुलामुळे नगर-मनमाड रेल्वे गाड्या धावण्यासाठी बळकटी मिळाली आहे.
तसेच या कामामुळे रेल्वे ताशी 130 प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार आहे. मंगळवारी झालेल्या चाचणीत या द्रुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. यावेळी ताशी 130 कि.मी. वेगाने रेल्वे धावली. नगर ते मनमाड पर्यतंचा टप्पा पुर्ण होण्यास अजून एक वर्ष लागतील असा अंदाज आहे.
या अधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत पुणतांबा ते कान्हेगाव द्रुतगती लोहमार्गाची चाचणी घेण्यात आली.
रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी ए.के. पांडे, मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे, उप मुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता डी.पी. पटेल, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, सहाय्यक कार्यकारी अभियंता आर.जे. गायकवाड, सिनियर सेक्शन इंजिनिअर प्रगती पटेल, सेक्शन इजिनिअर धर्मेंद्र कुमार, सुद्धाशु कुमार, एक्झिकेटीव्ह, इंजिनिअर व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
मनमाड ते नगर डबल लाईन (द्रुतगती) रेल्वे मार्गाच्या नव्या टप्प्याची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा नेमका वेग काढण्यात आला आहे. यामध्ये ताशी 130 कि.मी. वेग नोंदवला गेला आहे. या महत्त्वकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असून, नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल. -दीपक कुमार (उप मुख्य अभियंता (बांधकाम) अहमदनगर)े