वाह भाई वाह….च्या घोषणा देत रक्तदानात सहभागी
रक्तदाता हा एखाद्याचा जीवदाता ठरतो -संजय सपकाळ
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर मोबाईल रिटेल असोसिएशन यांच्या वतीने शहरात आयोजित महा रक्तदान शिबिरात हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी सहभागी होवून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रविवारी (दि.20 जुलै) सकाळी एकत्रितपणे आलेल्या सर्व हरदिनच्या सदस्यांनी वाह भाई वाह….च्या घोषणा देत रक्तदानासाठी सर्वांना प्रेरित केले. मागील पंचवीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रासह पर्यावरण संवर्धन व योगातून निरोगी आरोग्याची चळवळ चालविणाऱ्या ग्रुपच्या सदस्यांनी रक्तदान मोहिमेत पुढाकार नोंदवला.
नंदनवन येथे झालेल्या रक्ताने माणुसकीचे नवे नाते जोडणाऱ्या या रक्तदान शिबिरामध्ये अभिजीत सपकाळ, दिपकराव धाडगे, सुधीरशेठ कपाळे, मुन्ना वाघस्कर, शशांक अंबावडे, योगेश हळगावकर, जालिंदर अळकुटे, योगेश चौधरी, सर्वेश सपकाळ आदी सदस्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, जहीर सय्यद, दिलीप ठोकळ, सचिन चोपडा, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, अशोक पराते, दीपक घोडके, रतनशेठ मेहेत्रे, मनोहर दरवडे, सुभाष पेंढुरकर, दीपकशेठ मेहतानी, मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार, बंटी दळवी, नितीन नामदे, सचिन पेंढुरकर, अविनाश जाधव, अविनाश पोतदार, निजाम पठाण, शेषराव पालवे, प्रकाश देवळालीकर, नवनाथ वेताळ, प्रज्योत सागू, अजेश पुरी, नामदेवराव जावळे, दिलीपशेठ गुगळे, रामनाथ गर्जे, शिरीष पोटे, राजू कांबळे, किरण फुलारी, योगेश हळगावकर, डॉ. अतुल मडावी, देविदास गंडाळ आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, रुग्णांच्या आयुष्यासाठी रक्त ही जीवनावश्यक बाब बनली आहे. रक्तासाठी मनुष्य मनुष्यावरच अवलंबून असून, ही मानवतेची चळवळ गरजू रुग्णांना जीवदान देणारी आहे. थैलीसीमीया, डायलिसिस आणि कर्करोगाच्या रुग्णांना रक्ताची नितांत आवश्यकता भासत असते. तर एखादी दुर्घटना व अपघातामधील रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासते. अशा वेळेस रक्तदाता हा एखाद्याचा जीवदाता ठरत असतो. माणुसकीच्या भावनेने प्रत्येकाने रक्तदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.
आमदार संग्राम जगताप यांनी हरदिनच्या सदस्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या रक्तदानाचे कौतुक केले. यावेळी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आमदार जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, मोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्यासह आयोजकांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचा देखील गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.