साडी-चोळी देऊन सन्मानाने पाठविले घरी
कोरोना काळात भान हरवून फिरत होती रस्त्यावर
अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार, मनोरुग्णांना आधार देऊन त्यांचा सांभाळ करुन उपचारानंतर बरे झालेल्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पातून आनखी एका महिलेला तिच्या कुटुंबात पुनर्वसन करण्यात आले. कोरोना काळात भान हरावून रस्त्यावर फिरत असलेल्या या महिलेला मानवसेवा प्रकल्पाने आधार दिला होता. या महिलेवर उपचार करुन तिला नुकतेच तिच्या घरी साडी-चोळी देऊन सन्मानाने पाठविण्यात आले.
मानसिक विकलांगतेमुळे मानसिक भान हरवलेली सबेरा कोरोना काळात टाळेबंदीमध्ये रस्त्यावर फिरत होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सबेरा या महिलेला स्नेहालय संस्थेत दाखल केले होते. स्नेहालय संस्थेमार्फत पुढील उपचार व पुनर्वसनासाठी सबेरा या महिलेला 29 डिसेंबर 2021 रोजी मानवसेवा प्रकल्पात दाखल करण्यात आले.
मानवसेवा प्रकल्पाचे मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी या महिलेवर उपचार केले. संस्थेच्या अध्यक्षा पूजा मुठे यांनी महिलेचे समुपदेशन केले. समुपदेशनातून मिळालेला पत्ता व माहितीनुसार मुठे यांनी व संस्थेचे कार्यकर्ते अंबादास गुंजाळ यांनी थेट सबेराच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. सबेरा या महिलेची मुलगी व जावई 21 नोव्हेंबर रोजी अरणगाव येथील मानवसेवा प्रकल्पात येऊन सबेरा हिला ताब्यात घेतले. श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षा पूजा मुठे, उपाध्यक्षा शारदाताई होशिंग, मार्गदर्शक महेश पवार यांनी सबेराला साडीचोळी देऊन सन्मानाने कुटुंबियांच्या ताब्यात दिले.
शारदाताई होशिंग म्हणाल्या की, मनोरुग्णांना पूर्ण बरे करण्याची प्रक्रिया दिर्घकालिन असते. इतर आजारांसारखे याचे झटपट रिझल्ट मिळत नाहीत. मनोरुग्णांना स्विकारुन त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक झाला तर या समस्येचे निरकारण होऊ शकेल. मनोरुग्णांचे पुनर्वसन ही फक्त त्या कुटुंबापुरती मर्यादीत बाब नसून, ही सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
सबेरा या महिलेच्या उपचार व पुनर्वसनासाठी संस्थेचे मार्गदर्शक संजय शिंगवी यांच्या मार्गदर्शनाने स्वयंसेवक सोमनाथ बर्डे, अंबादास गुंजाळ, सिराज शेख, राहुल साबळे, प्रियंका गायकवाड, सुशांत गायकवाड, मंगेश थोरात, स्वप्नील मधे यांनी परिश्रम घेतले.