• Wed. Oct 15th, 2025

कोल्हुबाई मातेच्या गड परिसरात 300 वडाचे व 50 पिंपळाच्या झाडांची लागवड

ByMirror

Jul 20, 2024

जय हिंद फाउंडेशनचा वृक्षारोपणाचा उपक्रम

वृक्षारोपणाने जय हिंदची पर्यावरण संवर्धनाची चळवळ बहरत आहे -विद्यासागर कोरडे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धानाची मोहिम राबवित असलेल्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने कोल्हार (ता. पाथर्डी) कोल्हुबाई मातेच्या गड परिसरात 300 वडाचे व 50 पिंपळाच्या झाडांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने व जिल्ह्याला हरित करण्याचा संकल्प घेऊन फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्षारोपण अभियानातंर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.


जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्कॉडन लीडर विद्यासागर कोरडे व उपसैनिक कल्याण अधिकारी चित्रसेन गडांकुश यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन अभियानाला प्रारंभ करण्यात आले. यावेळी कोल्हार गावचे सरपंच राजू नेटके, उपसरपंच गोरक्ष पालवे, महादेव पालवे गुरुजी, गौरव गर्जे, माजी सरपंच बाबाजी पालवे, उपसरपंच कारभारी गर्जे, किशोर पालवे, जय हिंद फाउंडेशनचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, बबन पालवे, कैलास पालवे, किसन जावळे, विष्णू गिते, बबन पालवे, भास्कर पालवे, निवृती पालवे, चंदू पालवे, अंबादास पालवे, चंदु नेटके, शाहू पालवे, बाबासाहेब घुले, साहेबराव जाधव, कैलास पालवे आदींसह ग्रामस्थ व जि.प. शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.


शिवाजी गर्जे यांनी जय हिंद फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात सुरु असलेल्या वृक्षरोपण चळवळीची माहिती दिली. सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे म्हणाले की, जय हिंदच्या प्रयत्नाने कोल्हुबाई मातेचे गड हिरवाईने नटणार आहे. या गडाला निसर्गाचे पुनर्वैभव प्राप्त होणार आहे.

वड व पिंपळाच्या झाडामुळे हा परिसर बहरणार असून, निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर पर्यटनाचे केंद्र होणार आहे. फाऊंडेशनच्या वृक्षारोपणाने पर्यावरण संवर्धनाची चळवळ बहरत असल्याची भावना व्यक्त करुन जय हिंदच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. महादेव पालवे गुरुजी यांनी गडाचा विकास हेच आमचे ध्येय असल्याचे स्पष्ट केले. आभार बबन पालवे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *