महापरिनिर्वाण दिनानिमित्त बौद्धवंदनेसह जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
कामगार वर्गासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राबवलेली धोरण दिशादर्शक – एन. एम. पवळे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा परिषदेतील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वच्छता कर्मचारी, सफाई कामगार आणि कास्ट्राईबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत बाबासाहेबांना मानवंदना दिली. यावेळी बौद्धवंदना म्हणत “जय भीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष एन. एम. पवळे, जिल्हाध्यक्ष के. के. जाधव, उपमहासचिव निवृत्ती आरु, सचिव छानराज क्षेत्रे, माजी कार्यकारी अभियंता पी.पी. खंडागळे, अतिरिक्त महासचिव सुहास धीवर, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, जिल्हा संघटक बुद्धानंद धांडोरे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सफाई कर्मचारी माया निळे, अनिता जंगम, संजीवनी जाधव, सुवर्णा शिरवाळ, सुजाता गायकवाड, महेरूम शेख, लक्ष्मी येवले, लता पारखे, जयश्री डांगोर, धीरज कांबळे यांसह अन्य कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
राज्याध्यक्ष एन. एम. पवळे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर कामगार कल्याणमंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय आजही क्रांतिकारक ठरतात. कामगारांचे तास कमी करून श्रमाला मान्यता दिली, कामगारांना सामाजिक सुरक्षा देणारी धोरणे राबवली. त्यांचे कल्याणकारी धोरण आजही कामगार वर्गासाठी मार्गदर्शक आहे.” तसेच बाबासाहेबांनी उभारलेल्या सामाजिक न्यायाच्या मूल्यांची आठवण करून देत त्यांच्या विचारांवर चालण्याचे त्यांनी आवाहन केले.
जिल्हाध्यक्ष के. के. जाधव म्हणाले की, “तत्कालीन व्यवस्थेविरोधात संघर्ष करत दीन-दलित, शोषित-वंचितांचा खरा उद्धार करण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. जातिव्यवस्थेच्या अंध:कारमय काळातून समाजाला काढून ज्ञान, विज्ञान आणि समानतेची प्रकाशवाट त्यांनी दाखवली. त्यांचे कार्य आणि विचार हे भारतीय लोकशाहीचे मूळ बळ आहे.
