अहिल्यानगरमध्ये होणाऱ्या सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणार गौरव
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कवयित्री तथा लेखिका सरोज आल्हाट यांना कविवर्य नारायण सुर्वे जन्मशताब्दी निमित्त, मराठी साहित्य मंडळ (ठाणे) यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. अहिल्यानगर मध्ये दि. 9 नोव्हेंबर रोजी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित सोळाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आल्हाट यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
स्व. शाहूराव देशमुख साहित्य नगरीत संमेलनाचे उद्घाटक आमदार संग्राम जगताप, संमेलन अध्यक्ष तथा जेष्ठ कादंबरीकार दशरथ यादव, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर, स्वागत अध्यक्ष जयद्रथ खाकाळ व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष त्र्यंबकराव (बाळासाहेब) देशमुख यांनी दिली.
साहित्य व सामाजिक कार्यासाठी आल्हाट यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या गेल्या 30 वर्षापासून साहित्य, समाजसेवा आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे मराठी तसेच इंग्रजी काव्यसंग्रही प्रकाशित झाले आहेत. अनेक मासिकांचे संपादन त्यांनी केले असून, त्या विविध सामाजिक व इतर संस्थांच्या पदाधिकारी आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
