बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीची मागणी
नगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची जयंती (बुध्द पौर्णिमा) साजरी करण्यात आली. शहराच्या सिध्दीबाग येथील बौध्द विहार मधील गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीची केंद्र सरकारकडे मागणी केली.
या अभिवादन सोहळ्यासाठी जिल्हा प्रभारी सुनील ओहळ, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा महासचिव राजू शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, सलीम अत्तार, बाळासाहेब काते, चंद्रकांत दोंदे, संजय संसारे, अशोक तांबे, कैलास कोळगे, कचरू लष्करे, अनिकेत कडू, गणेश बागल, जयसिंग यादव, रवीननंद कुमार, राजेंद्र रामफळे आदींसह बसपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुनील ओहळ म्हणाले की, बिहार मधील महाबौध्दि बुद्धविहार येथे द बौद्ध गया टेम्पल ॲक्ट 1949 लागू आहे. त्यामध्ये पाच गैर बौद्ध सदस्य असून, बौध्द धर्मगुरुंना आपल्या बुद्धविहारात विधीवत पूजेचा अधिकार मिळत नसल्याने हे एक प्रकारे बौद्ध धर्माचा अपमान आहे. बौद्ध समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा धार्मिक स्थळ बौद्ध धर्मगुरूंच्या ताब्यात देण्याची गरज आहे. त्यामुळे तेथे दररोज बौद्ध धर्मगुरु विधीवत पूजा करु शकतील. महाबौध्दि बुद्धविहार मुक्तीसाठी देशभर आंदोलन होत असून, बहुजन समाज पार्टी देखील यामध्ये समाविष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारने महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करून नवीन कायदा तयार करावा व महाबौध्दि बुद्धविहार बौद्ध धर्मगुरूंच्या स्वाधीन करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नुकतेच भारत-पाक युध्दात शहीद झालेल्या भारतीय जवानांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.