शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या सेवाकार्यात अन्नदानातून हातभार लावण्याचे भाग्य मिळाले -मिलापचंदजी पटवा
अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या निस्वार्थ रुग्णसेवेतून अनेकांना नवजीवन मिळत आहे. या आरोग्य मंदिरातून मानवसेवा घडत असून, या सेवेत अन्नदानच्या रुपाने हातभार लावण्याचे पटवा परिवाराला भाग्य मिळाले. या हॉस्पिटलमध्ये माझ्यावर बायपास सर्जरी होऊन, नवीन जीवन मिळाले. तर याच हॉस्पिटलच्या हृदयरोग तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्याची मला संधी मिळाल्याचा आनंद होत असल्याची भावना महावीर भोजनालयाचे संचालक मिलापचंदजी पटवा यांनी व्यक्त केली.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटर मध्ये श्रीमती स्व.लिलाबाई हरकचंदजी पटवा यांच्या स्मरणार्थ पटवा परिवाराच्या वतीने आयोजित मोफत हृदयरोग तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी पटवा बोलत होते. यावेळी रुपेश पटवा, लिलाताई मिलापचंदजी पटवा, संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लाणी, सुभाष मुनोत, अभय गुगळे, मानकचंद कटारिया, डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अमित थोपटे, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. विनय छल्लाणी, डॉ. राहुल एरंडे आदी उपस्थित होते.
पुढे पटवा म्हणाले की, भोजनालयाच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या सर्व रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अल्पदरात भोजन दिले जात आहे. गरजू रुग्णांकडून व डायलेसिसला येणाऱ्या रुग्णांना भोजन व्यवस्था मोफत असल्याची त्यांनी माहिती दिली. हॉस्पिटलच्या कार्डियाक सेंटरच्या माध्यमातून सुरु असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
प्रास्ताविकात डॉ. प्रकाश कांकरिया म्हणाले की, वीस वर्षापूर्वी तीन ते पाच लाख रुपये खर्च असलेल्या बायपास सर्जरी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अवघ्या पन्नास हजार मध्ये करण्याची संकल्पना रुजविण्यात आली. अल्पदरात सर्वोत्तम व दर्जेदार आरोग्यसेवा दिली जात असल्याचे हॉस्पिटल देशभरात नावरुपाला आले. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर समाजाकडून घेऊन समाजाला समर्पित करणारी ही रुग्णसेवा आहे. सेवाभाव व सर्वोत्तम दर्जा पाहून अवघ्या महाराष्ट्रातून हृदयरोग रुग्ण उपचारासाठी या आरोग्य मंदिरात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना महावीर भोजनालयाच्या वतीने अल्प दरात दिले जाणाऱ्या भोजन व्यवस्थेचे कौतुक केले.
डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, महिन्याला 60 ते 70 बायपास सर्जरी यशस्वी होत असून, आजपर्यंत 50 हजार पेक्षा जास्त बायपास सर्जरी यशस्वी झाल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये असलेला अद्यावत कार्डियाक विभाग सेवेचा आधार असून, कॅथलॅब देशातील सर्वोत्कृष्ट कॅथलॅब म्हणून नावरुपास आली आहे. कार्डियाक विभागात लहान मुलांपासून वयोवृध्दां पर्यंतच्या हृदयाच्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या जात आहे. यासाठी अद्यावत मशनरी उपलब्ध करून उच्च दर्जाची सेवा दिली जात आहे. जीवनदायी योजनेचा माध्यमातून ही सेवा मोफत दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
या शिबीरात 79 रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी अल्पदरात केल्या जाणार आहेत. तर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.
