जिल्हा रुग्णालयात अरेरावी करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर कारवाईची व्हावी
तर तडीपारच्या प्रस्तावाला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी
नगर (प्रतिनिधी)- रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी अरेरावी करुन कर्तव्यात कसूर करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभाग ट्रेनिंग इन्चार्ज यांच्यावर कारवाई व्हावी व पांढरीपुल येथील पालवे टोळीच्या तडीपाराचा प्रस्तावाला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन सदर टोळीवर तडीपाराची कारवाई करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे, शाहीर कान्हू सुंबे, राजेंद्र पाटोळे, जिल्हाध्यक्ष विनोद साळवे, शांताराम जगताप, तालुकाध्यक्ष दत्ता वामन आदी सहभागी झाले होते.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण यांनी नागरिकांशी गैरवर्तणूक तक्रारबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तर लेखी खुलासा तात्काळ कार्यालयास सादर करण्याचे स्पष्ट केले असून, अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा लेखी पत्राद्वारे देण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभाग ट्रेनिंग इन्चार्ज आपल्या मर्जीनुसार कार्यालयात येतात व जातात. 12 वाजताच कार्यालयातून गायब होत असून, विचारणा केली असता जेवणासाठी गेले असल्याचे सांगतात. दुपारी 3 वाजता कार्यालयात गेले असता, 5 वाजता येतात आणि नागरिकांना विनाकारण वेठीस धरून एक महिन्यांनी यावे असे सांगतात. नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात. वरिष्ठांना देखील न जुमानता उद्धट व गैरवर्तुणुक करुनसर्वसामान्य नागरिकांची अडवणुक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच पांढरी पुल येथील सराईत गुंड असलेल्या पालवे टोळीवर अनेक पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारीला पाठबळ मिळत असून, गुन्हेगारांवर कारवाईस विलंब होत आहे. पोलीस स्टेशनकडून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळीवर जाणून बुजून कारवाईबाबत कानडोळा करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. संबंधित अधिकारी यांची चौकशी करून तडीपारचा प्रस्तावाला विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.