विद्यार्थी जीवनातील आठवणींना दिला उजाळा
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल 18 वर्षांनी एकत्र आले. नवनाथ विद्यालयातील सन 2004-05 च्या दहावी बोर्डातील विद्यार्थी शाळेत येऊन आपल्या जुन्या आठवणीत रममाण झाले होते. तर शाळेत आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींबरोबर एकच धमाल केली.

या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते. शालेय शिक्षकांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मुख्याध्यापक किसन वाबळे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, चंद्रकांत पवार, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, बाबुराव जाधव, मंदा साळवे, अमोल वाबळे आदी उपस्थित होते.
प्रारंभी आदर्श लॉन येथे एकत्र येऊन सर्व माजी विद्यार्थ्यांनी गावातील शाळा गाठली. या जुन्या सवंगडी व मैत्रिणींनी शाळेतील वर्गात एकत्र येत विद्यार्थी जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. आपल्या लाडक्या शिक्षकांशी देखील विद्यार्थ्यांनी मनमुराद गप्पा मारुन जुन्या आठवणी सांगितल्या. प्रत्येकाने आपले विचार व्यक्त केले.

शाळेत विविध कला, क्रीडा व शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्सान देणारे ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचा माजी विद्यार्थ्यांनी विशेष सन्मान केला. याप्रसंगी जालिंदर आतकर, अजय ठाणगे, अंबादास निकम, अतुल फलके आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन माजी विद्यार्थी सुरेखा डोंगरे-जाधव, मोरेश्वर सुर्जे, सचिन शिंदे, कविता शिंदे, रेखा डोंगरे, दिपक खळदकर, जालिंदर काळे आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल वाबळे यांनी केले. आभार वैशाली सोनवणे यांनी मानले.