पोटली फेरीवाल्यांच्या न्याय, हक्काच्या संरक्षणासाठी पुढाकार
कोणत्याही व्यवस्थेकडून फेरीवाल्यांना त्रास दिला जावू नये -कॉ. अभय टाकसाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- बस स्थानक परिसरात विविध खाद्यपदार्थ वस्तूंची विक्री करणाऱ्या पोटली फेरीवाल्यांच्या न्याय, हक्काच्या संरक्षणासाठी तारकपूर बस स्थानक येथे शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन स्थापन करण्यात आले. या युनियनच्या शाखेचे उद्घाटन फलकाचे अनावरण करुन भाकप महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा कॉ. स्मिता पानसरे यांच्या हस्ते झाले. यावेळी फेरीवाल्यांनी इन्कलाब जिंदाबाद…., कामगार एक जुटीच्या जोरदार घोषणा दिल्या.
शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनचे राज्याध्यक्ष कॉ. अभय टाकसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी भाकपचे जिल्हाध्यक्ष बन्सी सातपुते, आयटकचे राज्य उपाध्यक्ष ॲड.कॉ. सुधीर टोकेकर, संध्या मेढे, सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख, राज्यसचिव संजय नांगरे, जिल्हाध्यक्ष भैरवनाथ वाकळे, जिल्हा सचिव फिरोज शेख, जिल्हा सहसचिव हनीफ शेख, प्रविण बनकर, युनियन सदस्य अन्वर शेख, अहमद सय्यद, शराफात अली सय्यद, हेमंत पुरी, सचिन कांबळे, अमित मोरया, गणेश चेन्नुर, सुरेश जगताप, इरफान खान, सलमान खान, शकील शेख, जफर शेख, भाऊराव शेळके, संतोष गायकवाड, दत्ताभाऊ वडवणीकर, विजय केदारे, तुषार सोनवणे, दिपक पाडळे, दिपक जऱ्हाट, विशाल बोरा आदींसह बस स्थानक परिसरातील फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉ. अभय टाकसाळ म्हणाले की, बसस्थानक परिसरात हॉकर्स बांधव विविध खाद्यपदार्थ व वस्तूंची विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवितात. त्यांच्या कष्टाचे दाम त्यांना मिळाले पाहिजे. त्यांच्यावर कोणत्याही व्यवस्थेकडून त्रास दिला जावू नये, या उद्देशाने त्यांना संघटित करण्यात आले आहे. उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमनचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ. स्मिता पानसरे म्हणाल्या की, न्याय, हक्कासाठी असंघटित कामगारांना एकत्र येवून संघर्ष करावा लागणार आहे. बस स्थानक येथील फेरीवाल्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना आधार देण्याची गरज आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शाकीर शेख म्हणाले की, पोटली फेरीवाला धोरणात बस स्थानक परिसरात विविध खाद्यपदार्थ व वस्तूंची विक्री करणाऱ्यांचा समावेश होतो. त्यांना कायद्याने संरक्षण मिळाले आहे, मात्र एसटी महामंडळ व पोलीस प्रशासनाकडून त्यांना गुन्हेगारी सारखी वागणूक दिली जाते. त्यांच्या हक्कासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार आहे. त्यांना महापालिकेच्या माध्यमातून ओळखपत्र मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हक्काची जपवणूक संघटनेच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे ते म्हणाले.